मुंबई - मनुष्याच्या आयुष्यात जीवन आणि मरण या दोनच गोष्टी अटळ आहेत. दर दिवशी काही मृत्यू घडत असतात परंतु एखाद्या सेलेब्रिटीचे निधन झाले की सर्व ठिकाणी ती बातमी आणि त्या व्यक्तीचे गुणविशेष चर्चिले जातात. कालच मराठी मनोरंजनविश्वातील एका सेलेब्रिटीच निधन झालं. अनेक नाटकं, मालिका आणि चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता प्रदीप पटवर्धन याचे देहावसान झाले. अर्थातच त्याच्या मित्रमंडळींनी आणि सहकलाकारांनी त्याच्या आठवणी जागवल्या. प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमितने समाज माध्यमांवर त्यांच्या निधनाची हळहळ व्यक्त करताना लिहिले, “आठशे खिडक्या, नऊशे दारं, सगळंच उचलून घेऊन गेलास, तेही अवेळी....अलविदा दोस्ता....”.
प्रदीप पटवर्धन यांचे बंधू सुधीर पटवर्धन यांनी त्यांच्या निकटवर्तीयांना सांगितले की, “प्रदीप आदल्या रात्री एका स्पर्धेत परीक्षक म्हणून गेला होता. रात्री उशीरा घरी आला. तो गजानन महाराजांची पारायणे करत होता. मंगळवार हा त्याच्या पारायणांचा शेवटचा दिवस होता. सकाळी त्याचं डोक खूप दुखायला लागल म्हणून तो ५ वाजता उठला. पण डोक दुखायचं थांबेना म्हणून बाम लावून झोपला तो उठलाच नाही. झोपेतच त्याचे प्राणोत्क्रमण झाले. अत्यंत दुर्दैवी घटना.”
प्रदीप पटवर्धन सोबत काम केलेले अभिनेते सुरेश सहस्रबुद्धे म्हणाले की, “आम्ही दूरदर्शनच्या ‘गजरा‘ कार्यक्रमात अनेक स्किट्स केली. वाशके वाधमा झ्यातू तमाना रे वाडगो....ही लाईन उलटी म्हणून बघा. पट्या (प्रदीप पटवर्धनचे दोस्त त्याला या नावाने हाक मारायचे) ही केडी लाईन मला अजून आठवते आहे. "गजरा" कार्यक्रमात त्याचा अभिनय वाखाणण्याजोगा होता. व.पु.काळे यांचे लेखन आणि पट्या चा शाब्दिक आणि आंगिक अभिनय, मग काय विचारता पब्लिक एकदम खूष .....!”
सुपरस्टार राजेश खन्नाचे घर गिरगावात. परंतु तो स्टार झाल्यावर तिथे कधी फिरकालाच नाही. तसेच जितेंद्र सुद्धा गिरगावकर आणि तो अगदी हल्लीहल्ली पर्यंत गणेशोत्सवात गिरगावात चक्कर मारत असे. परंतु आपला पट्या पक्का गिरगावकर. त्याने कधीच गिरगाव सोडले नाही अगदी शेवटचा श्वास घेईपर्यंत. विजय कदम, विजय पाटकर आणि प्रदिप पटवर्धन हे तिघेही विनोदी अभिनेते परंतु त्यांची खास दोस्ती होती आणि शेवटपर्यंत ते घट्ट मित्र होते.
पटवर्धनचा पट्या झाला होता तसा पाटकरचा पाट्या झाला होता. अगदी कॉलेजच्या दिवसांपासून त्यांची मैत्री होती. विजय पाटकर म्हणजेच पाट्याने विजय पटवर्धन म्हणजेच पट्या बद्दल सांगितले की, “दहीहंडीच्या वेळी पट्या खास आकर्षण असायचा. त्याला स्पेशल नाचायला बोलाविले जाई. त्याचा डान्स बघण्यासाठी गिरगावातील चाळींच्या बाल्कनी तुटूंब भरलेल्या असायच्या. आज एव्हडी गर्दी, कदाचित, एखाद्या बॉलिवूड अभिनेत्याला बघायलाही जमत नसावी.”
हेही वाचा - ''नुसत्या स्टार्सच्या नावावर चित्रपट चालण्याचे दिवस गेले'' करीना कपूर