मीरा भाईंदर(ठाणे) - मिरा-भाईंदर शहरात नोकरी करत असलेल्या गरजू विध्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी रात्र शाळा सुरू करावी अशी मागणी नागरिकांकडून गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. ही मागणी लक्षात घेता येत्या काळात रात्र शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करणार असल्याची माहिती महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी दिली.
मिरा-भाईंदर शहराची 15 लाख लोकसंख्या आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या 36 प्राथमिक शाळा आहेत. पालिकेने शाळा सुरू केल्या असल्या तरी इयत्ता सातवीपर्यंतच शाळा आहेत. त्यामुळे आर्थिक परिस्थिती नसलेले अनेक विद्यार्थी नाईलाजास्तव पुढील शिक्षण घेत नाहीत. विद्यार्थी शिक्षण अर्ध्यावर सोडत असल्याने त्यांचे नुकसान होते. अशा मुलांसाठी दिवसा नोकरी करून रात्री शिक्षण घेण्यासाठी रात्र शाळेचा पर्याय उपलब्ध असतो. परंतु मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात रात्र शाळा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते.
पालिका प्रशासनाने लवकर निर्णय घेत शहरात रात्रशाळा व ज्युनियर कॉलेज सुरू करावे अशी मागणी भाजपाचे नगरसेवक मदन सिंह यांनी महापौर व आयुक्त यांच्याकडे केली होती. यावर महापौर ज्योत्स्ना हसनाळे म्हणाल्या, की पालिकेच्या सुरू असलेल्या शाळेत रात्र शाळा सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध होऊ शकते. पालिका प्रशासनासोबत चर्चा केल्यानंतर प्रस्ताव तयार केला जाणार आहे.
दरम्यान, अशासकीय खासगी शाळांमधील अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल आणि रात्र शाळा शिक्षक यांना सातवा वेतन आयोग राज्य सरकारने गतवर्षीपासून सुरू केला आहे.