ठाणे - आधारवाडी डंपिंगवरील कचऱ्याचा डोंगर कोसळून कोट्यवधींचा निधी परतीच्या पावसामुळे खाडीच्या पाण्यात वाहून गेला आहे. विशेष म्हणजे आधारवाडी डंपिंगवर कचरा टाकण्यास न्यायालयाने मनाई करूनही शेकडो टन कचरा साठवला जात असल्याने याठिकाणी कचऱ्याचा मोठा डोंगर उभा राहिला आहे. यामुळे पर्यावरणालाही हा मोठा धोका निर्माण झाला आहे.
हेही वाचा - विविध समस्या विरोधात महिला काँग्रेस रस्त्यावर
कल्याण - डोंबिवली महापालिका क्षेत्रातील शेकडो टन कचरा दिवसागणिक आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवर टाकला जातो. यामुळे डंपिंगवर पालिकेच्यावतीने विविध योजनेअंतर्गत कोट्यवधीचा निधी खर्च करण्यात येतो. अशाच प्रकारे डंपिंग ग्राऊंवरील साठवलेला कचरा कल्याणच्या खाडीत जाऊ नये म्हणून गेल्या अडीच वर्षांपूर्वी माजी आमदार प्रकाश भोईर यांच्या निधीतून जेटी बंदर तसेच खाडी किनारी भिंत व रस्ता उभारण्यात आला होता. यासाठी सुमारे २ कोटींचा निधी खर्च करण्यात आला. मात्र, परतीच्या मुसळधार पाऊस आणि खाडीच्या पुरामुळे या रस्त्याची भयाण अवस्था होऊन गेल्या अडीच ते दोन महिन्यापासून हा बंद आहे. यामुळे कचऱ्याचा मोठा डोंगर उभा राहिल्याने हा कचरा खाडीला भरती आली की, सरळ खाडीच्या पाण्यात मिसळतो. त्यामुळे खाडी किनारी मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांचा मासेमारीचा व्यवसाय धोक्यात आला आहे.
दरम्यान, आधारवाडी डंपिंग ग्राऊंडच्या खाडी किनारी कोट्यवधी रुपये खर्चून पेव्हरब्लॉक टाकत रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र, या रस्त्यावर आलेला कचरा व दुभंगलेला रस्ता दुरुस्तीकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.