ठाणे - भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेच्या आज पार पडलेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत कोणार्क आघाडीच्या प्रतिभा विकास पाटील यांनी बाजी मारली आहे. कोणार्क विकास आघाडीचे 04 नगरसवेक, रिपाई ऐक्य - 04, समाजवादी 02 आणि 01 अपक्ष अशा 11 नगरसेवकांची मोट बांधून कोणार्क विकास आघाडी यंदा मैदानात उतरली होती. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 46 नगरसेवकांची आवश्यकता होती.
कोणार्क आघाडीचे विलास पाटील यांच्या राजकीय खेळीमुळे काँग्रेसमध्ये फूट पडून कोणार्कच्या प्रतिभा पाटील यांचा 49 मते मिळवून विजय झाला.
काँगेसच्या उमेदवार रिशिका राका यांना 41 मते मिळाली. काँग्रेसची एक हाती सत्ता असून देखील पक्षाला आठ मतांनी पराभव पत्करावा लागला. काँग्रेसची जवळपास 18 मते फुटल्याने त्यांना हा फटका बसला आहे.
काँग्रेसकडे 47 नगरसेवक होते. मात्र, काँग्रेसचे 18 आणि विरोधीपक्षाच्या गटातील भाजपचे 20 नगरसेवक कोणार्क विकास आघाडीत दाखल झाल्याने सत्ताधाऱ्यांचा गोटात खळबळ उडाली होती. यातच भाजपचे 20 नगरसेवक असूनही पक्षाने महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल न करता केवळ काँग्रेसचा पराभव करण्यासाठी कोणार्क आघाडीला साथ दिली.
महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक मुंबई उपनगर जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 12 वाजता पार पडली. निवडणुकीच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांची वेळ पीठासीन अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र, पक्षाच्या स्थानिक पातळीवर काँग्रेस नगरसवेकांमध्ये साटंलोटं न झाल्याने अनपेक्षित निकाल लागल्याचे चित्र आहे.
दरम्यान, उपमहापौरपदासाठी काँग्रेसेचे इम्रानवली मोहमंद यांना ही 49 मते मिळाली. त्यांनी शिवसेनेच्या बाळाराम चौधरी यांचा 08 मतांनी पराभव केला. यामुळे काँग्रेस व शिवसेनेची सत्ता महापालिकेतून गेल्याने दोन्ही पक्षांना मोठा धक्का मानला जात आहे.