सोलापूर- आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्या या उपयूक्त असून त्यांचा आहारात वापर केल्याने आरोग्य चांगले राहते. याची माहिती सर्व सामान्य शहरी लोकांना व्हावी, या हेतून कृषी विभागाच्या वतीने रानभाजी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर शहरातील नेहरू नगर येथे भरविण्यात आलेल्या या रानभाजी बाजाराला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.
रानावनात अनेक भाज्या अशा आहेत, की ज्या रानभाज्या खाल्याने आरोग्याला त्याचा चांगला फायदा होतो. मात्र अनेक रानभाज्या अशा आहेत की ज्यांची अनेकांना माहिती नाही. ज्या रानभाज्या शहरातील लोकांना माहिती नाहीत, या भाज्यांची माहिती व्हावी आणि लोकांचे आरोग्य देखील चांगले रहावे, यासाठी सोलापूर कृषी विभागाच्या वतीने रानभाजी बाजार भरविण्यात आला होता.
माहिती असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या दररोजच्या जेवणात वापरल्या जातात. मात्र बांबूच्या कोवळ्या पानांची, सराटा, केनपाट, इचका, पिंपळ पान, भुई आवळी, कुरडू या रानभाज्यांचीही भाजी होते, हे माहिती नसते. रानभाज्या खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. रक्ताभिसरण व्यवस्थित होते तर काही भाज्या मधुमेह, हृदयविकारावरही उपयुक्त आहेत. याचा रोजच्या आहारात वापर वाढण्याच्या दृष्टीने रानभाज्यांची माहिती सर्वसामान्य लोकांना होणे गरजेचे आहे. त्यासाठी हा भरविण्यात आला होता.
राज्य शासनाच्या कृषी विभाग आणि प्रकल्प संचालक आत्मातर्फे रानभाज्या बाजार भरविण्यात आला होता. यावेळी आमदार सुभाष देशमुख, उपमहापौर राजेश काळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, कोरडवाहू कृषी संशोधन केंद्राचे ज्येष्ठ संशोधक डॉ. अमृत सागर आदींसह शेतकरी उपस्थित होते.
नवीन पिढीला रानभाज्या समजाव्यात, त्यांचे आरोग्यातील महत्व समजावे यासाठी जागतिक आदिवासी दिनी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. कृषी अधिक्षक बसवराज बिराजदार यांनी कोरोनाच्या काळात रानभाज्यांचे महत्व पटवून दिले. महोत्सव आयोजनाबाबत माहिती दिली. लॉकडाऊनमध्ये सोलापूर शहरात नागरिकांना भाजीपाला कमी पडू दिला नाही. रानभाजीला आयुर्वेदिक महत्व असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांनी रानभाज्यांची शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान केला. तसेच रानभाजी माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाला अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील, आत्माचे प्रकल्प उपसंचालक मदन मुकणे, कृषी उपसंचालक रवींद्र माने, शिवकुमार सदाफुले, शहाजी पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.