सोलापूर - नऊशे वर्षांची परंपरा असलेल्या सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महायात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. नंदी ध्वज (मानाच्या काठ्या) घेऊन 68 लिंगांना तैल अभिषेक करण्यात आले. सिद्धेश्वर महायात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्या वाड्यापासून सिद्धेश्वर महायात्रा सुरू झाली. परंतु, कोरोना महामारी किंवा ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी फक्त पन्नास जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. मंदिर परिसरात संचारबंदी लागू केली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा - Omicron In Solapur : सोलापूरकरांची चिंता वाढली.. ओमायक्रॉनचा शहरात शिरकाव.. पहिला रुग्ण आढळला
सिद्धेश्वर महायात्रा पोलीस बंदोबस्तात प्रारंभ -
उत्तर कसब्यातील हिरेहब्बू यांच्या वाड्यात काल मंगळवारी रात्री बारा वाजता मानाच्या पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजास सांज चढवण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर राजशेखर हिरेहब्बू व राजशेखर देशमुख यांच्या हस्ते नंदीध्वजांची पूजा करण्यात आली. बुधवारी सकाळी आठ वाजता सात नंदीध्वज सिद्धेश्वर मंदिरात नेऊन ठेवण्यात आले. मंगळवारी सकाळी 11 वाजता सिद्धेश्वर मंदिरातील अमृत लिंगाजवळ विडा देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
13 जानेवारी रोजी संमती कट्ट्याजवळ सात नंदीध्वजांच्या साक्षीने अक्षता सोहळा होईल. 14 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता हळद काढण्याचा कार्यक्रम होईल. संध्याकाळी होम मैदानावर होम विधीचा कार्यक्रम होणार आहे.
16 जानेवारीला सिद्धेश्वर महायात्रेची सांगता -
15 जानेवारीला संध्याकाळी फडकुले सभागृहजवळ भाकणुकीचा कार्यक्रम होईल. 16 जानेवारी रोजी दक्षिण कसब्यातील देशमुख यांच्या वाड्यात योग दंडाच्या पूजनाने धार्मिक विधीची सांगता होईल. रात्री दहा वाजता नंदीध्वजांचा वस्त्र विसर्जन कार्यक्रम होईल. त्यानंतर यात्रेची सांगता होणार आहे, अशी माहिती मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी दिली.
महायात्रेबाबत आमदार विजय देशमुख यांनी व्यक्त केली नाराजी -
दरवर्षी सोलापुरातील सिद्धेश्वर महायात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पण, कोरोना महामारीमुळे दोन वर्षांपासून काही मोजक्या भाविकांना आणि मानकऱ्यांना प्रवेश दिला जात आहे. आणि मोजक्या भाविकांच्याच उपस्थितीत सिद्धेश्वर महायात्रा संपन्न होत आहे. दरवर्षी महायात्रेवर अनेक निर्बंध लागू होत असल्याने भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा - Three Minor Girls Drowned Solapur : पाणी पिण्यासाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू