पुणे - मुंबई-पुणेसारख्या महानगरांमध्ये वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब आहे. पुणे शहराचा विचार केला तर पुण्यातल्या वाहतूक कोंडीला अजूनही प्रशासनाकडे उत्तर नाही. पुणे शहराचा झपाट्याने विकास होतो आहे. एकीकडे शहराचा हा विकास केवळ बांधकामांपुरता मर्यादित आहे की काय? अशी अवस्था दिसून येते. शहरात वाढणाऱ्या बांधकामांमुळे केवळ बकालपणा वाढलेला दिसतो आहे. ही वाढ होत असताना आवश्यक असलेल्या साधन सुविधांचा अभावच अनेक ठिकाणी जाणवतो आणि तीच बाब शहराच्या वाहतुकीच्या संदर्भात देखील आढळून येते. एकेकाळी पुणे शहराची ओळख ही दुचाकींचे शहर अशी होती. मात्र गेल्या काही काळात शहरात चारचाकीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
शहर झपाट्याने वाढत असताना वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब शहराच्या विविध उपनगरांमध्ये तसेच आयटी हब असलेल्या हिंजवाडी परिसरात पाहायला मिळत आहे. या वाहतुकीवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडून नवीन रस्ते बांधणे, फ्लायओव्हर बांधणे असे नेहमीच प्रयोग केले जातात. मात्र पुणे शहरातल्या या वाहतूक कोंडीवर उपाय करायचा असेल तर सध्याची असलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही अधिक बळकट अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे मत या क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करतात.
सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गरज
पुणे शहरात सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने मोठ्या प्रमाणात लोक स्वतःच्या दुचाकी, चारचाकी गाड्या वापरतात. या गाड्या रस्त्यावर आल्याने सहाजिकच वाहतूक कोंडी ही शहराच्या विविध भागात पाहायला मिळते. तसेच गेल्या काही काळात आर्थिक स्थिती सुधारल्याने दुचाकी आणि चार चाकी घेणाऱ्यांचे प्रमाण देखील शहरात वाढले आहे. त्याचा परिणाम रस्त्यावर येणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन करताना ते वाहन केंद्रित नियोजन न करता नागरिक केंद्रित नियोजन केले पाहिजे. जेणेकरून नागरिकांचा विचार या वाहतूक नियोजनामध्ये झाला पाहिजे. मात्र तसे होताना दिसत नाही. प्रशासन हे वाहन केंद्रित नियोजन करू पाहत जे आवश्यक नसल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्यांना वाटते.
वॉक, बस, सायकल या त्रिसूत्रीचा वापर गरजेचा
वाहतूक कोंडी या समस्येवर उपाय करायचा असेल तर डब्ल्यूबीसी अर्थात वॉक, बस, सायकल या त्रिसूत्रीचा वापर केला पाहिजे, वाढवला पाहिजे. प्रशासनाने त्यासाठी नियोजन केले पाहिजे. एकेकाळी पुणे शहर हे सायकलींचे शहर म्हणून ओळखले जायचे. पुणे शहरात सायकल जाणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. मात्र जसजशी दुचाकी आणि चार चाकी वाहनांची संख्या वाढत गेली तसतसे सायकल चालवणाऱ्यांना रस्ते मिळणे अवघड झाले. रस्त्यावरून सायकल चालवायची कशी? असा प्रश्न निर्माण झाल्याने सायकलींची संख्याही आपोआपच कमी होत गेली.
सायकल ट्रॅकवर नावालाच उरले तर फूटपाथ फेरीवाल्यांनी बळकावलं
गेल्या काही काळामध्ये पुणे शहरात ठिकठिकाणी सायकल ट्रॅक तयार करण्यात आले. तसेच पायी चालणाऱ्या लोकांसाठी फूटपाथ तयार करण्यात आले. मात्र हे सायकल ट्रॅक केवळ नावालाच असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. सोबतच फूटपाथ हे ठिकाणी फेरीवाल्यांनी बळकावल्याचा दिसून येते. तर अनेक ठिकाणी फुटपाथवरून दुचाकी गाड्या जात असल्याचे चित्रही पाहायला मिळते. त्यामुळे पायी चालणारे आणि ज्यांना सायकल चालवायची इच्छा आहे, अशांची कोंडी होत आहे. प्रशासनाने जर पायी चालणारे आणि सायकल चालवणारे यांचा विचार केला, तर शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीतून सुटका होऊ शकते. पण त्यासाठी योग्य प्रकारे नियोजन करणे आवश्यक आहे. असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले.
हेही वाचा - भरधाव वेगात आलेली कार शिरली दुकानात, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद; अल्पवयीन चालकावर गुन्हा दाखल
हेही वाचा - कठडा नसलेल्या विहिरीत पडला 18 महिन्याचा बिबट; चार तासांच्या रेस्क्युनंतर बचावले प्राण