पुणे - राज्यातील विविध विद्यापीठातील वेगवेगळ्या विषयांच्या अंतिम परीक्षा घेण्यावरून सध्या वाद सुरू आहे. विद्यार्थ्यांचे अंतिम शैक्षणिक वर्ष असल्याने भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोना संसर्गाच्या काळात परीक्षा घ्यायच्या कशा, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने सरकारने अंतिम वर्षाच्या सर्वच परीक्षा रद्द करून मागील कामगिरीच्या आधारे मूल्यमापन करण्याचा निर्णय घेतला. याद्वारे विद्यार्थ्यांना पास करण्याचे ठरले. मात्र या भूमिकेला राज्यातील विरोधकांनी आक्षेप घेत परीक्षा घेतली नाही तर 'कोरोना बॅच' म्हणून या विद्यार्थ्यांवर ठपका बसेल, अशी भूमिका घेतली. यामुळे गोंधळाला सुरुवात झाली. त्यात काही विद्यार्थी संघटना या परीक्षा घेऊ नये, काही संघटना परीक्षा घेण्याची गरज व्यक्त करत आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या विविध महाविद्यालयात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची संख्या 2 लाख 36 हजार आहे. या सर्वांचेच भविष्य टांगणीला लागले आहे.
दुसरीकडे परीक्षा घ्यायच्या ठरल्या, तर त्या कशा घ्याव्या? सुरक्षेच्या उपायांचे काय? अनेक विद्यार्थी ग्रामीण भागात परत गेले आहेत. त्यांच्या येण्या-जाण्याचे काय, परीक्षा काळात राहायचे कुठे, हॉस्टेल बंद असे अनेक प्रश्न उपस्थित होणार आहेत. त्यामुळे काय भूमिका घ्यायची याबाबत विद्यापीठेदेखील संभ्रमात आहेत. अनेक विद्यार्थी, पालक परीक्षा होणार का, झाली तर कशी, आणि कधी होणार, असे प्रश्न विद्यापीठाच्या परीक्षा विभागात फोन करून विचारत आहेत. त्यामुळे राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षांचे काय, हा प्रश्न कायम आहे.
परीक्षा होणारच...
कोरोनाच्या सावटामुळे महाराष्ट्र शासनाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, यूजीसीने परिपत्रक काढून अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात यावी असे नमूद केले. लॉकडाऊचे सर्व नियम पाळून परीक्षा पार पाडाव्या, असे सुचवण्यात आले. मात्र, स्वत:च्या निर्णयावर ठाम राहत राज्य शासनाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणार नसल्याने, विद्यार्थी संभ्रमात आहेत.
यूजीसी देशात परीक्षांचे नियोजन करत असते. परीक्षा घेण्यासाठी यूजीसीने होकार दिला असला तरी राज्यशासन नकाराची घंटा वाजवत आहे. त्यामुळे सध्या तरी राज्यात राज्यात अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांनी परीक्षा देणे सुरक्षिततेचे नाही. त्यातच रुग्ण संख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.