पुणे - कोरोनाची पार्श्वभूमीवर असतानाही राज्यात विविध राजकीय पक्षांचे मेळावे, आंदोलने, निवडणुका होत आहेत. यात गर्दीवर कोणतेही बंधन नाही, मग महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यावर इतकी बंधने कशासाठी? शिवजयंती साजरी करण्याबाबतच्या अटी शिथिल करण्यात याव्यात, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शिवजयंती साजरी करू, असा इशारा शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे यांनी दिला आहे. या पत्रकार परिषदेला संतोष नानवटे, मनोहर वाडेकर आदी उपस्थित होते.
ताबडतोब अनावश्यक अटी रद्द कराव्या
19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती आहे. यंदा शिवजयंती साजरी करण्यास राज्य सरकारने अनेक अटी घातल्या आहेत. त्यामुळे जगभर साजरा होणाऱ्या यंदाच्या शिवजयंतीवर अनेक निर्बंध आले असून शिवप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. केवळ शंभर लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणूक, अभिवादन सभा, पोवाडे, व्याख्याने संस्कृतीकरण घेऊ नये अशा पद्धतीच्या कार्यक्रमांवर बंदी आणली आहे.
शिवनेरी, रायगड तसेच अन्य कोणत्याही किल्ल्यांवर जाऊ नये आदी अटी घातल्या आहेत. या अटी अयोग्य असून, प्रत्येक शिवप्रेमी नियमांचे पालन करून शिवजयंती साजरी करणार आहे. त्यामुळे सरकारने ताबडतोब अनावश्यक अटी रद्द करून शिवजयंती साजरी करण्यास परवानगी द्यावी. या अटी रद्द न केल्यास राज्यभरातील तमाम शिवप्रेमी शिवभक्त मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानी जाऊन शिवजयंती साजरी करतील, असेही यावेळी दहातोंडे म्हणाले.