पुणे - प्रसिद्ध ज्योतिषी रघुनाथ राजाराम येमुल (वय 48) यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील उद्योजक गणेश नानासाहेब गायकवाड यांना पत्नीविषयी अघोरी सल्ला देऊन लग्न मोडण्याच्या कटात सहभागी असल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. अनिष्ट रूढी आणि अघोरी कलमान्वये चतु:शृंगी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 27 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार महिलेवर पती, सासू सासरे आणि इतरांनी शारीरिक व मानसिक अत्याचार करण्यासोबतच अमानुष मारहाण केली होती. याप्रकरणी एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणाशी संबंध असल्याच्या कारणावरून अध्यात्मिक गुरू रघुनाथ येमुल यांना अटक करण्यात आली. 23 जानेवारी 2017 पासून हा प्रकार घडत होता.
पत्नी पांढऱ्या पायाची, तिला सोडचिठ्ठी देण्याचा सल्ला-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रघुनाथ येमुल याने आरोपी गणेश गायकवाड याला अघोरी सल्ले देऊन "तुझी पत्नी पांढऱ्या पायाची आहे. त्यामुळे तुझे सर्व ग्रह फिरले आहेत. म्हणून तू आमदार व मंत्री होणार नाहीस. त्यामुळे लवकरात लवकर तिला सोडचिट्ठी दे, मी देतो ते लिंबू तिच्यावर उतरविल्यावर तुझ्या मागची कायमची पीडा निघून जाईल' असे सांगितले होते. त्यामुळेच गणेश गायकवाड यांनी तक्रारदार महिलेला त्रास देऊन तिच्यासोबत अघोरी वर्तन केले होते.
ज्योतिषी रघुनाथ येमुल यांनी पीडित महिलेचा संसार मोडण्यासाठी अनिष्ट व अघोरी त्याचा वापर केला आहे. तसेच तिचा संसार मोडण्यासाठी त्यांच्या बेडरूम बाहेर हळदी कुंकू लावलेल्या आणि टाचण्या मारलेला लिंबू ठेवण्याचे तक्रारीत म्हटले आहे. या सर्व तक्रारी तथ्य आढळल्यानंतर चतु:शृंगी पोलिसांनी रघुनाथ येमुल यांना अटक केली आहे.