पुणे - जिल्ह्यातील विविध रुग्णालये, डेंटल क्लिनिकमध्ये म्यूकरमायकोसिसचे सुमारे एक हजार रुग्ण आढळले आहेत. या बुरशीची माहिती नसल्याने संसर्ग वाढत आहे. यामुळे वेळीच निदान, उपचार होत नसल्याने दात, वरचा जबडा, डोळे, दृष्टीवर परिणाम होत असून काही रुग्णांना प्राणदेखील गमवावे लागत आहेत. कर्करोगाच्या वाढीपेक्षा हा संसर्ग वाढण्याचा वेग दहापट आहे. सरकारने या संसर्गाची दखल घेऊन मार्गदर्शक तत्त्वे (एसओपी) तयार केली पाहिजे, असे मत डॉक्टर व्यक्त करत आहेत.
दंत शल्यचिकित्सक रुग्णाचे प्राण वाचवू शकतात -
कोरोना रुग्णांना म्यूकरमायकोसिसपासून वाचविण्यासाठी दक्ष राहणे आवश्यक असून फिजिशियन, कोरोना उपचार केंद्रे, डेंटल क्लिनिक, ओरल मॅक्सीलोफेशियल सर्जन (मुखशल्य चिकित्सक) नाक कान-घसा तज्ज्ञ, दंत शल्यचिकित्सक, न्यूरो सर्जन या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. रोगाचे निदान, उपचार आणि पुनर्वसन या तिन्ही टप्प्यात दंत शल्यचिकित्सक महत्त्वाचे योगदान देऊन रुग्णाचे प्राण वाचवू शकतात, असे मत डॉ. जे. बी. गार्डे यांनी व्यक्त केले आहे.
वेळेवर निदान आवश्यक -
वेळेवर निदान, शास्त्रशुद्ध उपचार, पुनर्वसन या तिन्ही टप्प्यात डॉक्टरांचे योगदान महत्त्वाचे आहे. कोविड बरा झालेल्या काही रुग्णांमध्ये दात हलणे, दुखणे, पू येणे, फोड येणे, वास येणे, नाकातून पू येणे, दृष्टी कमी होणे, डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. प्रसंगी यामुळे काही जणांना आपला वरचा जबडा, डोळादेखील गमवावा लागला आहे. मृत्यूचे प्रमाणही पन्नास टक्के झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर निदान होणे आवश्यक आहे. रुग्णाचे रोजचे ड्रेसिंग महत्त्वाचे आहे.
बुरशीजन्य आजार -
एका बुरशीमुळे होणाऱ्या संसर्गामुळे अनेकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. बुरशीमुळे होणाऱ्या या आजाराला 'म्यूकर मायकॉसिस' म्हणतात. म्यूकरमायकोसिसवर योग्यवेळी उपचार झाले नाहीत. तर संसर्ग शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पोहोचू शकतो. म्यूकरमायकोसिसग्रस्त रुग्णांवर जबडा, डोळा, दात यांची शस्त्रक्रिया करावी लागते. ज्या रुग्णांची प्रतिकारशक्ती चांगली आहे, त्यांना या बुरशीची लागण होत नाही. मात्र, अनियंत्रित मधुमेह, कर्करोग, एडस् असणाऱ्यांना, तसेच स्टिरॉईडस्, सायक्लोस्पोरिन ही प्रतिकारशक्ती कमी करण्यास कारणीभूत ठरणारी औषधे घेणाऱ्यांना हा आजार पटकन लक्ष्य बनवतो.
कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये वरचा जबडा, सायनस, डोळ्यांवर या बुरशीचा घातक परिणाम दिसत आहे. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे या बुरशीचे संक्रमण होत नाही. मात्र, दुषित मास्क, ऑक्सिजनच्या अस्वच्छ नळ्यातून बुरशीचे तंतू नाकातोंडात शिरकाव करू शकतो व सायनसमध्ये ठाण मांडून बसण्याची शक्यता आहे.
अंत्यत धोकादायक -
हिरड्यातून पू येणे, दात हलणे, ताप येणे, डोके, डोळे दुखणे ही या संसर्गाची लक्षणे आहेत. डोळ्यातून मेंदूला संसर्ग झाला तर मेंदू दाह होऊन मृत्यू ओढावू शकतो. काही रुग्णांमध्ये जबडा, डोळा काढून टाकावा लागतो. या जबड्याचे ६ महिन्यांनी पुनर्निर्माण शस्त्रक्रियेद्वारे करता येते. कृत्रिम डोळा बसवता येतो. मात्र, दृष्टी जाते, असे डॉ. जे. बी. गार्डे सांगतात.
हेही वाचा - विरोधी पक्षाने महाराष्ट्राला बदनाम करण्याचा विडाच उचलला आहे - विजय वडेट्टीवार