पुणे - शिरूर तालुक्यातील निमगाव भोगी गावात शेळ्यांच्या गोठ्यावर मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात 14 शेळ्या ठार झाल्या असून 4 शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेनंतर वनविभागाचे कर्मचारी, पशु वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.
गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याचे पाळीव प्राणी, जनावरांवरील हल्ले वाढत आहेत. शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी गावात प्रभु बबन आसवले या शेतकऱ्याच्या पाळीव शेळ्यांच्या गोठ्यात मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जंगलात राहणारा बिबट्या शिकारीच्या शोधात लोकवस्तीत येऊन पाळीव प्राणी, जनावरांवर हल्ले करत असून यामध्ये शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे वनविभागाने वेळीच बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.