पणजी - जगातील ५० टक्के संपत्ती ८ टक्के भांडवलदारांकडे तर देशात १ टक्के भांडवलदारांकडे ७३ टक्के संपत्ती आहे. त्यामुळे आम्ही कष्टकरी लोकांचे प्रश्न जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे समाजवाद अस्तित्त्वात येईपर्यंत कामगारांचा संघर्ष सुरुच राहील, असे मत अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस गोवाचे सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी आज येथे केले.
आयटक आणि सेंट्रल ट्रेड युनियनतर्फे पणजीत कामगार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सकाळी पाटो-पणजी येथील मध्यवर्ती बस स्थानक ते इम्येक्युलेट चर्च चौक अशी फेरी काढण्यात आली होती. यामध्ये राज्यातील विविध आस्थापने आणि कंपन्यांमधील कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी पुढे बोलताना फोन्सेका म्हणाले, की गोव्यात मागील तीन वर्षात 50 हजार कामगार बेरोजगार झाले आहेत. बंद खाण उद्योग सुरू करण्यासाठी सरकार कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही. जर खाण महामंडळ सुरू करून त्याद्वारे हा उद्योग करणे शक्य नसेल तर आम्हाला अधिकार द्यावेत खाण उद्योग आम्ही पूर्ववत करून दाखवू.
यावेळी जाहीर सभाही आयोजित करण्यात आली होती. यासाठी आयटक गोवाचे अध्यक्ष प्रसन्न उटगी, सीटूचे नरेश शिगावकर, सुहास नाईक, राजू मंगेशकर आदी उपस्थित होते. यावेळी माजी कामगार आयुक्त रत्नकांत म्हार्दोळकर, शास्त्रीय गायक शकुंतला भरणे आणि कामगार नेते एस. एस. नाईक यांचा शाल, श्रीफळ आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.