पणजी - सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या उपस्थितीत गोव्याचे लोक भारतीय नसल्याचे संबोधून रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने उद्धटपणा दाखविला असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर आम आदमी पक्षाने गोवा सरकारवर जोरदार टीका केली आहे. जर सरकार केंद्रीय संस्थांच्या अधिकाऱ्यांना आळा घालू शकत नाही आणि त्यांना गोमंतकीयांचा अपमान करण्यास परवानगी देत असेल तर भाजपने सत्ता त्याग करण्याची वेळ आली आहे. त्यांनी तसे करावे, असे आम आदमी पक्षाचे गोवा संयोजक एल्विस गोम्स यांनी म्हटले आहे.
हेही वाचा- देशात विकासाची असमान संधी! 'या' यादीत भारताचा ७६ वा क्रमांक
भाजप आमदार एलिना सालढाणा आपले पती दिवंगत मथानी सालढाणा यांचा वारसा सांभाळण्यास असमर्थ असल्याचा आरोप आपने केला आहे. त्यांचे आचरण अपमानास्पद असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
आप उमेदवारांच्या निवडणूक प्रचारासाठी सध्या दिल्लीत असलेले एल्विस गोम्स यांनी ट्वीटरवर रेल्वेचे दक्षिण-पश्चिम विभागाचे व्यवस्थापक अजय कुमार सिंग यांना सरकारी सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली. गोव्यात एनआरसी सुरू झाली आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे. एखाद्या अधिकाऱ्याने आमदार एलिना सालढाणा यांचा अपमान कसा केला? तसेच गोवेकर हे भारतीय नाहीत? हे म्हणणे तिरस्करणीय आहे, असे गोम्स यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
पक्षाचे सरचिटणीस प्रदीप पाडगावकर यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे गोव्यातील संपूर्ण लोकसंख्येच्या भावनांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. अलीकडच्या काळात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हादईच्या पाण्याच्या प्रश्नावर गोमंतकीयांना गृहीत धरुन थट्टा केली होती. याची आठवण करुन देत गोमंतकीयांविषयीची भाजपची मानसिकता केंद्रीय मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या वक्तव्यातून उघडकीस आली, असे पाडगांवकर यांनी म्हटले.
राज्याच्या व लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आमदारांच्या कमकुवत क्षमतांचा अंदाज आल्यामुळे तसे करण्यास ते धजले, असे त्यांनी पुढे म्हटले. कॉंग्रेसच्या आमदारांनी भाजपमध्ये उडी घेतल्याने सरकारची विश्वासार्हता आणखी उघड झाली आहे, असा टोमणाही त्यांनी मारला. पर्रीकर यांच्या निधनानंतर हे सरकार अमित शाह यांच्या मर्जीनुसार आणि सुचनांवर कसेबसे चालते, असा आरोप पाडगावकर यांनी यावेळी केला.
दक्षिण-पश्चिम रेल्वेचे मॅनेजर अजयसिंग यांनी केलेली टीका उद्धट असून संबंधित भाजप आमदार पुरेशी प्रतिक्रिया देण्यास असमर्थ असल्याचे दिसून आले. सीएएसारख्या कायद्यांद्वारे जातीय विष पसरवत असलेल्या भाजपवर गोमंतकीयांनी बहिष्कार घालावा, असे पाडगांवकर यानी म्हटले. आता अशी परिस्थिती उद्भवली आहे की, गोमंतकीयांनी इथल्या आमदारांचा नियंत्रित लोभ आणि दिल्लीत निस्वार्थी सरकार यामधील फरक समजून घेऊन गोव्यासाठी पर्याय निवडण्याची गरज आहे, असे पाडगांवकर यांनी म्हटले आहे.