नाशिक- शहरातील पश्चिम विभागातील संत कबीरनगरमधील मनपा शाळेतील सात वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेच्या परिसरातील खड्ड्यात पडल्याने मृत्यू झाला आहे. अक्षय पंडित साठे (वय ७) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
अक्षय साठे हा संत कबीर नगरमधील शाळा क्र. एकमध्ये ईयत्ता पहिलीत शिकत होता. मधल्या सुट्टीमध्ये लघुशंकेसाठी अक्षय शाळेबाहेर पडला. त्यानंतर तो खड्ड्यात पडला आणि त्याचा या घटनेत मृत्यू झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. परंतु, त्यास डॉक्टरांनी मृत घोषीत केले. अक्षयच्या आई-वडील आणि नातेवाईकांनी शाळा व्यवस्थापनास या घटनेसाठी जबाबदार धरले असून, त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.