नाशिक - पाकिस्तानातून परतलेली मूकबधीर गीता आपल्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी आता नाशिकला पोहचली आहे. नाशिकच्या एकलहरा भागात राहणाऱ्या रमेश सोळसे यांनी गीता आपली मुलगी असल्याचा दावा केला होता. मात्र, गीताने दावा करणाऱ्या आई-वडिलांना ओळखले नसल्याने पुन्हा एकदा गीताच्या पदरी निराशा पडली आहे.
रमेश सोळसे यांनी काय केला होता दावा.
लहानपणी तिच्या आईने गीताला रेल्वेत सोडून दिल्याचे रमेश सोळसे यांचे म्हणणे आहे. गीता ही नाशिकरोड मार्गाने दिल्ली आणि नंतर लाहोरला पोहचली असल्याचा अंदाज रमेश यांनी व्यक्त केला होता यावेळी रमेश यांनी गीताचा जन्मदाखला दाखवत गीताला गावाची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच रमेश यांची पत्नी आशा यांचा फोटो गीताला दाखवण्यात आला. मात्र, ही माझी आई नसल्याचे गीताने सांगितले आहे.
गीताने घेतले गोदावरी नदीचे दर्शन
नाशिकला आल्यावर गीताने पंचवटी भागातील गोदावरी नदीचे दर्शन घेतले. तसेच गोदावरी मातेला आपले आई वडील लवकर मिळावेत यासाठी प्रार्थना केली आहे.
महाराष्ट्र सरकरने मदत करावी
गीताला आई- वडिलांची भेट घालून देण्यासाठी आनंद सर्व्हिस सोसायटी आणि राज्यस्तरीय कर्णबधीर असोसिएशन प्रयत्न करत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रभर ते गीताच्या आई-वडिलांचा शोध घेत आहेत. शोध घेताना आमची आर्थिक ओढतान होत असून, महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री यांनी आम्हाला मदत करावी, असे आवाहन आनंद सर्व्हिस सोसायटीने केले आहे.
गीताचे हावभाव आणि इशाऱयावरून तिच्या कुटुंबाचा घेतला जातोय शोध
अधिकाऱयांनी सांगितले की, गीताच्या नाकाला उजवीकडे छिद्र केले आहे. त्यानुसार मूकबधीर महिलांच्या मते तिच्या मूळ गावाजवळ ऊस, तांदूळ आणि शेंगदाण्याचे पीक घेतले जात असावीत. दरम्यान, गीता ही तेलुगू चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता महेश बाबूची प्रशंसक आहे. गीताच्या हावभावानुसार तिच्या घरात इडली, डोसासारखे दक्षिण भारतीय पदार्थ बनवले जातात.
तसेच लहानपणीच्या पुसट आठवणींद्वारे गीताने आपल्या गावाजवळ एक रेल्वे स्थानक आणि गावातील नदीच्या किनाऱ्यावर एक मंदिर असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार सुरुवातीला गीताला नांदेड, परभणी आणि जालना जिल्ह्यातील रेल्वे स्थानक असणाऱ्या परिसरात आणले. यानंतर तेलंगाणाच्या सीमाभागात गीताच्या कुटुंबाचा शोध घेतला आहे.
5 वर्षात गीता आमची असल्याचा 20 कुटुंबांचा दावा -
गेल्या पाच वर्षांत देशाच्या विविध भागातील सुमारे वीस कुटुंबांनी गीताला त्यांची हरवलेली मुलगी असल्याचे सांगितले होते. मात्र, यातील एकाही कुटूंबाचा गीतावर असलेला दावा तपासात सिद्ध होऊ शकलेला नाही.
काय आहे प्रकरण -
गीता सध्या ३० वर्षे वयाची असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ती बालपणी चुकीने रेल्वेगाडीत बसून सुमारे २० वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये गेली होती. पाकिस्तानी रेंजर्सला ती लाहोर रेल्वे स्थानकावर समझोता एक्स्प्रेसमध्ये बसलेली आढळली होती.
देशाच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ती 26 ऑक्टोबर 2015 रोजी भारतात परत आली होती. त्यानंतर ती इंदौरमधील स्वयंसेवी संस्थेत वास्तव्य करत आहे व आपल्या कुटुंबीयांचा शोध घेत देशाच्या विविध भागांत फिरत आहे.