नाशिक - करूया संकल्प जलसंवर्धनाचा मोहिमेअंतर्गत नाशिक येथील प्रसिद्ध मानाचा राजा मित्र मंडळाच्या पदाधिकारी आणि भाविकांशी 'ईटीव्ही भारत'ने संवाध साधला. त्यांना पाणी बचतीबद्दल काय वाटते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
मराठवाड्यासोबत नाशिक जिल्ह्याला उन्हाळ्यात दुष्काळाच्या झळा बसल्या. नाशिकच्या 15 तालुक्यांपैकी 9 तालुक्यात सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर करून मदत पोहचवली. या काळात अनेक गावातील वाड्या-वस्त्यांवर हजारो टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. सर्वाधिक धरणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील पेठ, सूरगाणा, हरसूल, त्र्यंबकेश्वर, इगतपुरीतील नागरिकांना पाण्याच्या एका हंड्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली होती. पाण्याने तळ गाठलेल्या विहिरीत, जीव मुठीत धरून महिला उतरत असल्याचे भीषण वास्तव संपूर्ण महाराष्ट्राने बघितले होते.
ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष होते, त्याप्रकारचे दुर्भिक्ष नाशिक शहराला देखील पाणी कपातीला सामोरे जावे लागले होते. गंगापूर धरणातील पाणी साठा कमी झाल्याने जवळ पास दीड महिना शहरात दिवसातून एकदा पाणी कपात करावी लागली होती. पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर महानगर पालिकेने दंडात्मक कारवाई केली होती. यानंतर बहुतांश नाशिककरांनी स्वतः हुन पाणी जपून वापरण्याचा संकल्प करत एक आदर्श निर्माण केला. नेमके पाणी बचतीसाठी नागरिकांनी काय केले हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.