नाशिक - कर्जत जामखेडचे आमदार आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी भाजपाकडून वारंवार महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याच्या वक्तव्यांचा आज नाशिकमध्ये समाचार घेतला आहे. तीन-तीन महिन्यांचे भविष्य वर्तवत सरकार पाडण्याची भाषा करणाऱ्या विरोधकांना महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष पूर्ण केलेले कळणार नाही, असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे. रोहित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते.
जिल्ह्याचे पवार साहेंबांवर प्रेम-
रोहित पवार म्हणाले, राजकारणात आल्यापासून नाशिकला येण्याची सहावी ते सातवी वेळ आहे. या जिल्ह्यातील नागरिकांचे शरद पवार साहेबांवर विशेष प्रेम आहे. त्यामुळे येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधायला आलो आहे. महाविकास आघाडी सरकार हे तीन पक्षाचे असल्याने भाजपाकडून सातत्याने हे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र महाविकास आघाडील आमदारांवर भुजबळ साहेब आणि अजित दादा लक्ष ठेवून आहेत.
विरोधकांची सोशल मीडिया सक्षम-
महाविकास आघाडी हा एक प्रयोग आहे. सामान्य लोकांच हितासाठी हे सरकार काम करत आहे. मात्र, विरोधकांकडून केवळ विरोध करण्याचे काम केले जात असल्याची टीकाही पवारांनी यावेळी केली. तसेच विरोधकांची सोशल मीडियाची टीम तागदवर आहे. त्यांना आर्थिक बळ आहे. त्यामुळे विरोधकांकडून छोटा विषय लोकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांच्या मनावर बिंबवला जात असल्याचेही रोहित पवार यावेळी म्हणाले. त्यामुळे सत्ताधारी पक्षाने सुधा आपला सोशल मीडिया सक्षमपणे वापरला पाहिजे आणि भाजपच्या सोशल मीडिया सक्षमपणे उत्तर द्यायला हवे, असे मतही रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केले.़
केंद्र सरकार जीएसटीचा वाटा देत नाही-
विरोधक राज्यात महाविकास आघाडी सरकार चांगल्या प्रकारे काम करत असतानाही. केवळ विरोधाच्या भूमिकेतून सरकारच्या कामकाजावर टीका करत आहेत. मात्र, केंद्राकडून राज्याला अडचणीच्या काळात मदत होत नसतानाही राज्य सरकार राज्यातील समस्या सोडवत आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारचा GST चा वाटा देखील वेळवर मि्ळत नाही. केंद्र सरकारने कर्ज माफीत देखील राज्याची आणि राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याची टीका पवार यांनी यावेळी केली.
सरकार पाडण्याच्या वक्तव्यांवरून टीका-
भाजपाकडून वारंवार सरकार पाडण्याची भाषा केली जाते. मात्र, महाविकास आघाडी सरकार सत्तेची पाच वर्षे पुर्ण करेल आणि सत्ता पाडण्याची भाकिते वर्तवणाऱ्या भाजपला हे पाच वर्षे कधी उलटली हे कळणार देखील नाही, असा टोला देखील रोहित पवार यांनी भाजपाला लगावला आहे.