नाशिक- कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्यावतीने भाजप खासदार डॉ. भारती पवार यांच्या घरासमोर शेतकऱ्यांनी राखरांगोळी आंदोलन केले.
केंद्र शासनाने नुकताच शेतकरी व्यापार सुधारक कायदा लागू केला असून त्यानूसार शेतकरी आपला माल कुठेही विकू शकतात. मात्र, शासनाने याच कायद्याचा भंग केला असून कांदा निर्यातबंदी केली आहे. गेले सहा महिने कांद्याला अतिशय कमी दर होते. तेव्हा सरकारने शेतकऱ्यांना कोणतीही मदत केली नाही. आता कुठे परवडतील, असे दर मिळत असताना सरकारने निर्यातबंदी करत शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असे म्हणत भाजपाच्या खासदार डॉ. भारती पवार यांच्या घराबाहेर शेतकरी संघटनेच्यावतीने राखरांगोळी आंदोलन करण्यात आले. खासदारांनी संसदेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बाजू प्रभावपणे मांडून कांद्यावरील निर्यातबंदी कायम स्वरुपी उठवावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी शेतकरी संघटनेचे देवीदास पवार, शांताराम जाधव, माणिक देवरे, रामनाथ ढिकले, बाळासाहेब शेवले, भाऊसाहेब धुमाळ यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.