नाशिक - दिंडोरी शहरातील नगरसेवक तुषार वाघमारे यांनी स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन व प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांना व इतर क्षेत्रातील व्यावसायिकांना तब्बल 1 हजार हाताने लिहिलेली पत्रे पाठवली आहेत. या पत्रांद्वारे दिंडोरी शहराच्या स्वच्छता आणि जनजागृतीसाठी त्यांना एक उल्लेखनीय व अभिनव उपक्रम राबवला आहे.
हेही वाचा... भाजप नेते संबित पात्रांनी राहुल गांधींचं ठेवलं नवं नाव, म्हणाले...
तुषार वाघमारे हे सातत्याने अनेक समाजोपयोगी कामे करत असतात. वाघमारे यांनी नगरसेवक झाल्यापासून घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता या विषयांवर लक्ष देत अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. वाघमारे यांनी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा पत्रे पाठवण्यासाठी खर्च न करता पोस्ट ऑफिसच्या पोस्टकार्ड सुविधेचा वापर घनकचरा व्यवस्थापनाचा प्रबोधनात्मक सामाजिक संदेश नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी केला. त्यांनी तब्बल १ हजार हाताने लिहिलेली पत्रे लिहून नागरिकांना पाठवली आहेत. ही पत्र लिहिण्यासाठी त्यांना जवळपास ६ महिन्यांचा कालावधी लागला. सध्याच्या युगात घरी पत्र येतान दिसत नाहीत. मात्र, नगरसेवकाने पाठवलेले पत्र वाचताना नागरिकांच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण होत आहे.

हेही वाचा... दूध महागले! मदर डेअरीकडून प्रति लिटर ३ रुपयांची दरवाढ
वाघमारे यांनी हे पत्र पाठवल्यानंतर सर्वत्र या पत्राची चर्चा सुरू झाली आहे. यानंतर घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता तसेच प्लास्टिकचा वापर टाळणे, हे विषय गांभीर्याने नागरिकांमध्ये चर्चिले जात आहेत. जो परिणाम साध्य करण्यासाठी तुषार वाघमारे यांनी एवढे परिश्रम घेतले, त्याच्या प्राथमिक स्वरुपात त्यांना फळ मिळताना दिसत आहे. दिंडोरी शहरात सर्वत्र तुषार वाघमारे यांच्या या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या कार्याचे कौतुकही होत आहे.
हेही वाचा... शिक्षेच्या अंमलबजावणी प्रक्रियेला वेग; निर्भयाचे गुन्हेगार तणावाखाली, खाणे-पिणे झाले कमी - सूत्र