नाशिक - राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी आज रेशन दुकान व शिवभोजन केंद्रांना भेट देऊन सर्वत्र सोशल डिस्टन्स आणि स्वच्छता पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये, यासाठी महाविकास आघाडी सरकार अन्नधान्य उपलब्ध करत आहे. तसेच शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून राज्यात दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत एक लाख शिवभोजन थाळीचे वितरण होत आहे. मात्र या योजना राबवताना शासनाच्या सूचनांचे पालन होत आहे की नाही, याचा आढावा घेण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी शिवभोजन केंद्रांना भेट दिली.
बेघर तसेच मजुरांसाठी शासनामार्फत २३ मनपा शाळांमध्ये निवारा केंद्र व अन्नछत्राची सुविधा पुरवण्यात येत आहे. या निवारा केंद्रामध्ये एकूण ५७९ लोक आहेत. संबंधितांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधांचा भुजबळ यांनी आढावा घेतला. तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी विद्यालय मनपा शाळा क्र.१, म्हसरूळ येथील केंद्राला भेट दिली.