नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये पुरुषांप्रमाणेच महिलांचा सहभाग वाढवण्याचे संकेत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिले आहेत. उत्तराखंड राज्यातील हलद्वानी येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे संकेत दिले. भागवत यांनी मांडलेल्या विचारांचा संघाच्या दृष्टीने अर्थ काय आणि त्याची व्याप्ती किती असू शकते, हे समजून घेण्यासाठी आरएसएस अभ्यासक दिलीप देवधर यांना संपर्क केला तेव्हा त्यांनी सांगितले की, भागवत यांनी व्यक्त केलेल्या विचारांचा प्रभाव येत्या काही वर्षांत बघायला मिळेल. या कार्याला पूर्व - इतिहास असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
हेही वाचा - पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून एकाची हत्या, आरोपीचा शोध सुरू
डॉ. हेडगेवार यांनी संकल्पना मांडली होती की, रेल्वेचे दोन रूळ ज्या प्रमाणे समांतर असतात त्यानुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघात पुरुषांप्रमाणे महिलांचा देखील समावेश असला पाहिजे. त्या अनुषंगाने 1925 साली आरएसएसची स्थापना झाली, तर 1936 साली राष्ट्रसेविका समिती देखील कार्यान्वित झाली होती. राष्ट्रसेविका समितीच्या शिल्पकार मावशीबाई केळकर या संचालिका होत्या. १९४० साली गोळवलकर गुरुजी हे सरसंघचालक झाल्यानंतर त्यांनी संघ आणि समिती एकरूप व्हावी या करिता काही पावले उचलली होती. मात्र, त्यावेळी समिती आणि मावशीबाई केळकर यांनी तो प्रस्ताव नाकारला होता, त्यामुळे तो प्रस्ताव थंड बसत्यात गेला होता. मात्र, आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडलेला हा विचार गोळवलकर गुरुजी यांच्या विचारांवर आधारित असून त्याचे सकारात्मक दूरगामी परिणाम देशात बघायला मिळतील, असा दावा संघ अभ्यासक दिलीप देवधर यांनी केला आहे.
जगातील ४० देशांमध्ये महिला पुरुष स्वयंसेवकांचे एकत्रित कार्य
1936 साली राष्ट्रसेविका समितीचे कार्य प्रत्यक्षात सुरू झाले. त्यानंतर आजच्या घडीला भारताला वगळून जगातील 40 देशांमध्ये संघकार्य स्त्री - पुरुष कुटुंब एकत्रितपणे मिळूनच केले जाते. मात्र, आपल्या देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दोन केंद्र आहेत. पुरुषांचा संघ हा सर्वांना माहिती आहे, मात्र त्याच प्रमाणे महिलांकरिता राष्ट्रसेविका समिती कार्य करत असून त्या संघटनेचे नाव देखील आरएसएसचे असल्याचे दिलीप देवधर यांनी सांगितले.
देशातील २५ कोटी कुटुंबापर्यंत संघ जाणार
आरएसएसच्या जन्मशताब्दी नंतर संघपरिवाराच्या संघटनांमध्ये 50 टक्के महिलांचे कार्यकारिणीत समावेश असेल, असा दावा देखील देवधर यांनी केला आहे. देशातील प्रत्येक क्षेत्रातसुद्धा महिलांना ५० टक्के स्थान देण्याच्या उद्देशाने मोठे निर्णय घेतले जाणार असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला. जन्मशताब्दीपासून पुढच्या पंचवीस वर्षांकरिता संघाचे नियोजन करण्यात येणार आहे. ज्यामध्ये महिलांचे 50 टक्के प्रतिनिधित्व विविध सत्तेमध्ये असले पाहिजे. या करिता देशभरातील 25 कोटी कुटुंबांपर्यंत जाण्याची तयारी संघाची असेल, अशी माहिती संघ अभ्यासक दिलीप देवधर यांनी दिली.