नागपूर - मित्र पक्ष हे सुपारी घेतल्या सारखे वागत असल्याचे वक्तव्य नाना पटोले (Nana Patole Statement Issue) यांनी गोंदियामध्ये केल्यानंतर राष्ट्रवादीतूनही संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत वाद पेटणार असे चिन्ह निर्माण झाले आहे. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावर माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रवीण कुंटे (NCP spokesperson Praveen Kunte) यांनी केली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमात्र दुकान बंद पडेल, असे वक्तव्य अतिशय दुर्दैवी असून त्यांनी त्यांच्या आवाक्याबाहेर वक्तव्य करु नये, असा माझा त्यांना सल्ला असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते कुंटे म्हणाले. जयंत पाटील व अजित पवार यांचे नाव घेण्याची त्यांची लायकी नाही. साकोली विधानसभा मतदारसंघात त्यांचा झालेला निसटता विजय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे झाला. याचा त्यांना विसर पडला आहे. त्यांना सत्तेत असल्याचा माज चढला असेल आणि त्यांना अहंकार आला असेल तर त्यांनी सत्तेच्या बाहेर पडावे, असेही कुंटे म्हणाले.
'भाजपाची सुपारी घेतल्यासारखे बोलू नये'
आज राज्यात महाविकासआघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार आहे. नाना पटोले यांचे आजचे वक्तव्य सत्तेचा माज चढल्याचे प्रतिक आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि जयंत पाटील हे लोकनेते असून त्यांचावर बोलण्याची लायकी तपासून घ्यावी. वारंवार पक्ष बद्दलविणाऱ्या नाना पटोले यांनी हे तपासावे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून ते ज्यापद्धतीने भाजपा सोडून राष्ट्रवादीवर टीका करत त्यांच्या भूमिकेवर संशयी आहे, भाजपाची सुपारी घेतल्या सारखे बोलू नये. त्यांनी सत्तेच्या बाहेर पडून दाखवावे. शक्य नसेल तर बिनशर्त माफी मागावी, असेही प्रवीण कुंटे यावेळी म्हणाले.
हेही वाचा - मोदी सरकारच्या राजवटीत देश पन्नास वर्ष मागे - नाना पटोले