नागपूर - कौटुंबिक कलह ( Domestic violence ) , वाद-विवाद, प्रेम प्रकरण ( Love Affair ) आणि इतर अनेक लहान सहान कारणांनी आपले घर सोडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हरवलेल्या लोकांची वाढलेली ही आकडेवारी पोलिसांची चिंता वाढवणारी आहे. १ जानेवारी ते ३१ मे या केवळ पाच महिन्यांच्या कालावधी नागपूर शहराच्या विविध भागातून तब्बल 1529 लोक हरवले होते किंवा घर सोडून पलायन केले आहे. यामध्ये 718 महिला तर 657 पुरुषांचा समावेश आहे. एवढंचं नाही तर याच काळात 154 अल्पवयीन मुले आणि मुली देखील बेपत्ता झाले आहेत. या सर्वांच्या कुटुंबियांनी हरवलेल्यांचा शोध घेण्यासाठी शहरातील विविध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी देखील तेवढ्याचं तत्परतेने तपास करून 82 टक्के लोकांना शोधून काढले आहे.
600 महिलांना शोधण्यात पोलिसांना यश - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षीत घर सोडून जाणाऱ्यांची संख्या आणि हरवलेल्या नागरिकांची संख्या कमी झाली होती. मात्र, यावर्षी ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या पाच महिन्याच्या कालावधी एकूण 1529 नागरिक हरवले किंवा घर सोडून निघून गेल्याची नोंद पोलीस ठाण्यात दाखल आहे. यामध्ये 718 महिलांची संख्या असून या पैकी 600 महिलांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. तर 657 पुरुषदेखील घर सोडून निघून गेले होते. त्यापैकी 518 पुरुषांना घरी परत आणण्यात पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याशिवाय या पाच महिन्यांच्या काळात 154 अल्पवयीन मुले आणि मुली सुद्धा बेपत्ता झाली होती. त्यापैकी 131 जणांना शोधण्यात यश आले असून उर्वरित 23 बालकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. येत्या काळात ही मोहीम आणखी प्रभावी पद्धतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.
घर सोडून जाण्यामागे काय कारण? - इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांनी घर सोडून जाण्यामागे अनेक कारणं असू शकतात. या मध्ये प्रामुख्याने प्रेम विवाह,कौटुंबिक वाद, नैराश्य, मानसिक संतुलनाने ग्रासलेले,आई- वडिलांच्या दबावाला कंटाळलेले, आजारपण, सासरकडून होणारा छळ, मनासारख्या क्षेत्रात काम करू न देणे, यासह विविध कारणे आहेत. प्रेमसंबंधाचे कारणाने सुद्धा अनेक जोडपे घर सोडून बाहेर पडत असल्याचे कारण आढळते.
पालकांची भूमिका महत्त्वाची - घर सोडून जाणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुला-मुलींची संख्खा फार मोठी आहे. पाल्य बेपत्ता झालेल्या अनेक पालकांना आपले मुलं का घर सोडून गेलं होतं याचं योग्य कारणं कळत नाही. मात्र, एखादी घटना घडल्यानंतर पालकांना त्याची जाणीव होते. यासाठी पालकांनी तरुण मुलांना व मुलींना सोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवून त्यांच्या भावनाही समजून घेणे गरजेचे आहे. तरुण मुला,मुलींवर दबाव न टाकता त्यांच्या आवडी निवडीचाही विचार पालकांनी करणे गरजेचे आहे. जेणेकरून संभाव्य बेपत्ता होण्याचा प्रकार रोखण्यास मदत होईल.
हेही वाचा - सिद्धू मुसेवालाच्या हत्येत लॉरेंस बिश्नोईचे नाव समोर येताच सलमान खानच्या सुरक्षेत वाढ