मुंबई - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे राजकीय सोहळे सुरूच आहेत, पण समाजातील मोठ्या वर्गाने अद्याप स्वातंत्र्याची किरणे अनुभवलीच नाहीत. 'जय भीम' चित्रपटाच्या पडद्यावर हे जळजळीत वास्तव मला दिसले. एका चंद्रू वकिलाने सत्य आणि कायद्याची ताकद दाखवली, 'जय भीम'ची ताकद आपल्या देशाला कधी समजणार? असा प्रश्न आजच्या 'रोखठोक' या सदरातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित सेला आहे. त्याचबरोबर, 'फादर स्टॅन स्वामी तुरुंगात मारले गेले. सुधा भारद्वाज, वरवरा राव, गौतम नवलखांसारखे अनेक चंद्रू तुरुंगात खितपत पडले आहेत. या पार्श्वभूमीवर 'जय भीम' कोणाला म्हणावे? असा प्रश्नही शिवसेना नेते खासदार राऊत यांनी उपस्थित केला आहे.
'अनेक चंद्रू तुरुंगात' (rokhthok Article)
'जयभीम' सिनेमाच्या निमित्ताने दलित, आदिवासींवर होणाऱ्या अत्याचाराला एक वकील कशी वाचा फोडतात आणि त्यांना न्याय मिळवून देतात हे दाखवण्यात आले आहे. मात्र, स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करत असताना दलित आदिवासींचे प्रश्न मांडणाऱ्यांना तुरुंगात टाकले जात आहे. दरम्यान, हे सगळे होत असताना स्वातंत्र्याचा सूर्य कसा उगवतो? त्या सूर्याची किरणे कोणापर्यंत पोहचतात? असा प्रश्ननही राऊत यांनी उपस्थित केला आहे.
'स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही देशातील आदिवासी, दलित, पीडितांना काय मिळाले? या लोकांच्या डोक्यावर हक्काचे छत नाही. आजही त्यातील अनेकांना कायमस्वरूपी पत्ता नाही. त्यामुळे रेशनकार्ड नाही. जंगलात राहणाऱ्या या लोकांना मत देण्याचा अधिकार नाही किंवा त्यांची मते दुसरेच कुणीतरी आधीच टाकून मोकळे होतात. ही आपली लोकशाही! 'आदिवासींना शिक्षण आणि मत टाकण्याचा अधिकार कशासाठी हवा? त्यांना भीकच मागायची आहे. प्रौढ शिक्षणासारखे उपक्रम बेकार आहेत. ते बंद करा. हे लोक जास्त शिकले तर जास्त बकवास करतील, प्रश्न विचारतील', हा 'जय भीम' चित्रपटातील संवाद एका भीषण वास्तवाची जळजळीत जाणीव करून देणारा,' असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.
'चंद्रू'सारखे आज कुणी उभे राहतात तेव्हा त्यांना देशद्रोही ठरवले जाते'
जंगलातला हा अत्याचार आणि कायद्याची बेबंदशाही रोखणारे 'चंद्रू'सारखे आज कुणी उभे राहतात तेव्हा त्यांना देशद्रोही, वामपंथी, राज्य उलथविण्याचा कट रचणारे ठरवून पोलिसी शिकार व्हावे लागते. मुंबईच्या तुरुंगात फादर स्टॅन स्वामी वयाच्या 84व्या वर्षी मरण पावले. झारखंडच्या जंगलातील आदिवासी, वेठबिगारांच्या हक्कांसाठी ते लढत राहिले म्हणून राज्यसत्ता उलथवण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवून या विकलांग म्हाताऱ्याला आपण तुरुंगातच ठार मारले. छत्तीसगडमध्ये आदिवासींच्या मानवाधिकारासाठी लढणारे प्रा. सुधा भारद्वाज, कवी वरवरा राव हे सगळे मजूर वर्गाच्या हक्कांसाठी लढत राहिले. कारण अनेक राजकन्नू त्यांच्या सभोवती होते. त्यांचा आवाज, त्यांचे हक्क चिरडले गेले तेव्हा फादर स्टॅन स्वामी, सुधा, वरवरा रावसारखे 'चंद्रू' लढत राहिले. त्या सगळ्या लढवय्यांची कहाणी म्हणजे 'जय भीम'! चंद्रू जिंकला, पण सुधा भारद्वाज, वरवरा राव स्वतंत्र हिंदुस्थानच्या तुरुंगात सडत पडले आहेत!' असे म्हणत राऊत यांनी 'जय भीम'ची ताकद आपल्या देशाला कधी समजणार? असा सवाल उपस्थित केला आहे.
हेही वाचा - फ्रान्समध्ये असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे दुर्मिळ छायाचित्र आले समोर