मुंबई - नव्या वर्षात मुंबईकरांच्या सेवेत वॉटर टॅक्सी ( Water Taxi In Mumbai ) दाखल होणार आहे. मुंबई ते बेलापूर ( Mumbai to Belapur Route ) या मार्गावर येत्या दोन महिन्यात वॉटर टॅक्सी सेवा सुरु होणार आहे. यामुळे बेलापूर ते मुंबईचा प्रवासाचे अंतर सुद्धा कमी होणार आहे. सध्या भाऊचा धक्का ते बेलापूर अंतर जलमार्ग २० किलोमीटर, ( Distance Between Bhaucha Dhakka and Belapur is 20 km ) तर रस्ते मार्ग ४० किलोमीटर असून लागणार वेळ हा जलमार्गाने ३० मिनिट आणि रस्तेमार्गाने १ तास लागतो आहे. वॉटर टॅक्सीमुळे मुंबईकरांची वेळेची बचत होणार आहे.
- येत्या दोन महिन्या सेवा होणार सुरु
मुंबईनजीकच्या शहरांतून सकाळी व गर्दीच्यावेळी येताना वाहन चालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. रस्ते वाहतुकीवरील ही कोंडी फोडण्यासाठी आणि पर्यावरण स्नेही म्हणून जलमार्ग वाहतुकीला चालना देण्यात येणार आहे. मुंबईच्या नजीकच्या शहरांना जलमार्गाने जोडणाऱ्या वॉटर टॅक्सी आणि रोपॅक्स फेरी या जलमार्ग वाहतुकीची सुरूवात करण्याची घोषणा गेल्या काही महिन्यापूर्वी बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे राज्यमंत्री मनसुख मांडविय यांनी केली होती. त्यानुसार महाराष्ट्र पोर्ट ट्रस्ट आणि सागरी महामंडळ युद्धपातळीवर कामाला लागले आहे. कोरोनामुळे जेट्टी उभारण्याचा कामात अडथळा निर्माण झालेला होता. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे युद्धपातळीवर जेट्टी उभारण्यात येत आहे. तसेच १२ वॉटर टॅक्सीचे मार्गाचे काम सध्या अंतिम टप्यात आले असून मुंबई ते बेलापूर दरम्यान वॉटर टॅक्सीचे येत्या दोन महिन्यात सुरु करण्याचे नियोजन सागरी महामंडळाने केले आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार वॉटर टॅक्सीचे उदघाटन
भाऊचा धक्का ते बेलापूर दरम्यान वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मात्र, तूर्तास याबाबद पंतप्रधान कार्यालयाने वेळे दिलेली नाही. त्यामुळे या वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभाची तारीख निश्चित झालेली नाही. मात्र, नव्या वर्षात पंतप्रधान कार्यालयाकडून वेळ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यात वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभ होऊ शकते, अशी माहिती सागरी महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ईटीव्ही भारताला दिली आहे.
- वॉटर टॅक्सी 'या' मार्गावर धावणार
भाऊचा धक्का ते नेरूळ, भाऊचा धक्का ते बेलापूर, भाऊचा धक्का ते वाशी, भाऊचा धक्का ते ऐरोली भाऊचा धक्का ते रेवस, भाऊचा धक्का ते करंजा, भाऊचा धक्का ते धरमतार आणि बेलापूर ते ठाणे, बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया वाशी ते ठाणे, वाशी ते गेट वे ऑफ इंडिया आणि भाऊचा धक्का ते कान्होजी आंग्रे बेट या 12 मार्गावर वॉटर टॅक्सी धावरणार आहेत.
- मुंबईकरांची वेळेची बचत होणार
गेल्या वर्षीपासून भाऊचा धक्का ते मांडवा (अलिबाग) या रोपॅक्स अर्थात रोरो सेवेमुळे रस्ते मार्गाने होणारा ११० किलोमीटरचा प्रवास जलमार्गाने १८ किलोमीटर एवढा कमी झाला आहे. त्यामुळे दररोज या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे तीन ते चार तासांचा वेळ अवघ्या एका तासापर्यंत कमी झाला आहे. विशेष म्हणजे यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण सुद्धा कमी झालेले आहे. या फेरी सेवेचे प्रचंड फायदे बघता मुंबईतील विविध मार्गांवर अशाच प्रकारच्या सेवा कार्यान्वित करण्याची योजना वॉटर टॅक्सी आणि रोपॅक्स फेरी सेवेत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. यामध्ये वॉटर टॅक्सीचे १२ आणि रोपॅक्स फेरी सेवेचे ४ नवे मार्ग लवकरच सुरू केले जाणार आहे.
हेही वाचा - Winter Session 2021 Extension : लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील -मुनगंटीवार