मुंबई- शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सरकार तत्पर आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा परिसरात दामिनी पथक नेमण्यात येणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केलीय. तर महिला आणि बालकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यावर उपाययोजना आखण्यासाठी तरुणांचे नेतृत्व वाढवण्याची गरज आहे, त्यांच्या माध्यमातून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल आणि त्याद्वारे बालकांना सुरक्षित करण्यास सहकार्य लाभेल, असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत ‘बाल रक्षा अभियानाचा’ शुभारंभ सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आलाय. त्यावेळी गोऱ्हे आणि भुसे बोलत होते. यावेळी आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शाह उपस्थित होत्या.
आयोगाच्या जनजागृतीपर पोस्टरचे अनावरण : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या जनजागृतीपर पोस्टरचे अनावरण, बालरक्षा अभियान प्रशिक्षण पुस्तिकेचे प्रकाशन, चिराग ॲपचे डिजिटल पद्धतीने अनावरण विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आयोगाचे सदस्य चैतन्य पुरंदरे, जयश्री पालवे, सायली पालखेडकर, स्वयंसेवी संस्था विधायक भारतीचे संतोष शिंदे, समतोल फाउंडेशनचे विजय जाधव, प्रथम संस्थेचे किशोर भामरे, विपला फाउंडेशनचे प्रवीण कदम, अवर सचिव वंदना बोत्रा, वंदना भोसले यांच्यासह अधिकारी, समाजसेवी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पालक-शिक्षण समितीचे ऑनलाईन मॉनिटरिंग : बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिलीय. प्रत्येक शाळेत नेमण्यात आलेल्या पालक-शिक्षण समितीचे ऑनलाईन मॉनिटरिंग करण्यात येणार आहे. मुलांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी त्यांचे समुपदेशन करणे आवश्यक आहे आणि हेच समुपदेशन समवयस्क मुलांमार्फत झाल्यास ते नक्कीच प्रभावी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शासन आयोगास सर्व सहकार्य करेल : लहान बालकांच्या समस्यांबाबत तक्रारी नोंदवायच्या असतील तर चिराग ॲपद्वारे त्या नोंदविता येतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिलीय. या माध्यमातून ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील प्रत्येक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन आयोगास सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात येईल, सखी सावित्री समितीचा विस्तार करण्यात येणार आहे. पोक्सो कायद्यात अधिक कठोर तरतूदी करण्यात येणार असून, यासाठी सामाजिक संस्थांशी समन्वय साधणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.
हेही वाचा -