मुंबई - राज्य विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया आज ( सोमवारी ) विधानभवनात ( Vidhan Bhavan ) पार पडली. 285 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. काही तासाच मतमोजणीला सुरुवात होणार असून कोणाला परिषदेची ( Vidhan Paridhad Election ) लॉटरी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्य विधान परिषदेच्या रिक्त 10 जागांकरिता अकरा उमेदवार निवडणूक लढवत आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी दोन तर भाजपाने पाच उमेदवार रिंगणात उतरल्याने भाजपाच्या पाचव्या तर काँग्रेसच्या दुसऱ्या पसंतीच्या उमेदवाराची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
महाविकास आघाडीकडे सहा उमेदवार जिंकून येतील इतकं संख्याबळ आहे. मात्र राज्यसभेच्या निवडणुकीत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतिमुळे महाविकास आघाडी सपशेल निष्प्रभ ठरली. विधान परिषदेच्या निवडणुकीत मत फुटू नयेत, यासाठी आघाडीने विशेष खबरदारी घेतली आहे. त्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारणार हे निकालानंतर स्पष्ट होईल. सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण 285 मतदारांनी भाग घेतला. या प्रक्रियेदरम्यान भाजपाच्या मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप या दोन आमदारांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. हे प्रकरण राज्य निवडणूक आयोगाच्या समोर गेले आहे. लवकरच या प्रकरणावर निर्णय दिला जाणार असून थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीतही भाजपा आणि काँग्रेसने एकमेकांच्या मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे मतमोजणीला सात तास विलंब झाला होता.
हेही वाचा - Bacchu Kadu : मेल्यावरही सरकारबद्दलची नाराजी कायम राहणार - बच्चू कडू