मुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणावर आज न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र पुन्हा एकदा सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता आरक्षणावर येत्या 5 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकार वेळकाढूपणा करत असून, सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षणाला विलंब होत असल्याचा आरोप शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला आहे. तसेच आता इथूनपूढे मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाबाबत बोलावलेल्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान मराठा आरक्षणाचा तिढा सुटेल अशी अपेक्षा मराठा समाजाला असताना, पुन्हा एकदा त्यांची निराशा झाली आहे. सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, पुढील सुनावणी 5 फेब्रुवारीला पाच न्यायमूर्तींच्या बेंचसमोर होणार आहे. आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. शिवसंग्राम संघटनेचे नेत विनायक मेटे यांनी अशोक चव्हाणांवर टीका केली आहे.
'अशोक चव्हाणांकडून मराठा समाजाची फसवणूक'
मुख्यमंत्र्यांसमोर मराठा आरक्षणासंदर्भात मंत्री सकारात्मक बोलतात, पण त्यानंतर काही होत नाही, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे मराठा समाजाची फसवणूक करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठका होतात तेव्हा सर्व सकारात्मक बोललं जातं. मुख्यमंत्र्यांसह सर्वजण सकारात्मक बोलतात, मात्र त्याच्यावर अंमलबजावणी होत नाही. एकीकडे सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही दुसरीकडे मात्र नोकरभरती सुरू करण्यात आली आहे. ही मराठा समाजाची फसवणूक असल्याचा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे. दरम्यान सरकारकडून तयारी झाली नसल्याने, न्यायालयाकडे वेळ वाढवून मागितल्याचेही ते यावेळी म्हणाले.