मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राज्यात राजकीय घडामोडी वेगात सुरू झाल्या. याच कालावधीत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्यावर येऊन त्यांची भेट घेतली. त्यांची ही भेट तब्बल पाऊण तास चालली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांना विचारले असता ते म्हणाले, "काही नाही हो!, दोघे ही आरामात चहा पीत होते. तिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरू झाली, ती त्यांनी पहिली. ती संपल्यानंतर संजय राऊत बाहेर आले आणि तुमच्याशी बोलून निघून गेले".
राऊत आणि पवार यांच्या भेटीची चर्चा केवळ राज्यातच नाहीतर देशस्तरावर सुरू झालेली असताना आव्हाड यांनी मात्र पवार आणि राऊत हे केवळ दोघे चहा पीत बसले होते अशी माहिती देत दोघांच्या भेटीतील गुपित उघड करण्याचे टाळले. दोन्हीही नेते केवळ चहा पित होते असे सहजपणे सांगून आव्हाड यांनी राज्यातील नवीन राजकीय समीकरणे काय ठरलीत याची माहिती देण्यास टाळाटाळ केली.
शिवसेना एकीकडे आमचा मुख्यमंत्री होईल, असा दावा करत सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या संख्याबळ आहे, असे सांगत आहे. राष्ट्रवादीच्या जोरावर सेना हा दावा करत आहे का, असा सवाल केला असता आव्हाड म्हणाले, शिवसेना कोणाच्या जोरावर हा दावा करते माहित नाही, पण आमच्या जोरावर मात्र तो दावा करत नाही आम्ही विरोधातच बसणार आहोत आणि आम्हाला तसा कौल दिलेला आहे असे आव्हाड म्हणाले.
सरकार कोणाचे स्थापन होईल याविषयी विचारले असता आव्हाड म्हणाले मी काही ज्योतिषी नाही आणि कुंडली पाहत नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत शेवटचे वाक्य म्हटले की, मीच पुन्हा मुख्यमंत्री होईल ते वाक्य महत्त्वाचे असल्याचे आव्हाड यांनी सांगत एक सूचक इशाराही दिला.