मुंबई - राज्यात एकीकडे करोनाची स्थिती बिकट होत असताना राज्यात राजकारण तापल्याचं चित्र आहे. सोमवारी रात्री उशिरा मातोश्री या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात बैठक पार पडली. तर राजभवनावरील सुरू असलेल्या बैठकीवरून ठाकरे सरकार अस्थिर असल्याची चर्चा सुरू आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 'ज्या कुणाला आनंद होतोय त्यांना घेऊ द्या. विरोधी पक्षाला अशा प्रकारचे खेळ खेळू द्या. आम्ही पाच वर्षे पूर्ण करू'; तसेच निवडणूक देखील सोबत लढणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री शरद पवार यांच्यात गुप्त भेट झाली. हे मीडियाला कळले नाही. शरद पवार मातोश्रीवर आले. त्यांच्याकडून सरकारच्या भविष्याबद्दल तसेच कोरोनाबद्दल मार्गदर्शन घेतलं, तर कोणालाही वाईट वाटायचं कारण नाही, असं ते म्हणाले. पवार हे उत्तम प्रशासक आहेत. पवार साहेबांनी महाराष्ट्र घडवण्यात योगदान दिलंय. मोदीही पवारांचं मार्गदर्शन घेत असतात, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. या देशातील अनेक मुख्य नेते, विविध राज्यांचे मुख्यमंत्रीही शरद पवारांशी चर्चा करत असतात. त्यामुळे या बैठकीचा कोणताही वेगळा अर्थ काढू नये, असे राऊत म्हणाले.
राज्यपाल भेटीबाबत मीडियाने चुकीच्या बातम्या पसरवू नयेत. मागील दोन दिवस गाड्या उपलब्ध होत नाही, यावरून सुरू असलेला पियुष गोयल व रेल्वे वाद संपल्याचे देखील राऊत यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या परिस्थितीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायचे असल्यास त्यासाठी सगळ्यात फिट केस गुजरात आहे, असे राऊत यांनी म्हटले. सुरुवात गुजरातपासून करण्याचा सल्ला त्यांनी दिलाय. गुजरातमध्ये सरकारी रुग्णालयात अंधार कोठडी झाल्याचे उच्च न्यायालयाने त्यांना फटकारले आहे. यासाठी त्या ठिकाणच्या विरोधी पक्षाने आंदोलन पुकारण्याचा सल्ला राऊत यांनी दिलाय.
येणाऱ्या पाच वर्षांत सरकारला धोका नाही. उद्या महाविकास आघाडीचे 170 चे 180 आमदार झाल्यास आश्चर्य वाटू नये, असे राऊत यांनी आमदार फुटीबाबत वक्तव्य केले.