मुंबई - रेल्वे सुरक्षा दलातील कर्मचारी ( Railway Protection Force In Mumbai ) नेहमीच आघाडीवर कार्यरत असतात. केवळ रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी नव्हे तर ते प्रवाशांचे जीव वाचवणे अशा महत्वाच्या जबाबदाऱ्याही पार पाडत आहेत. मागील महिन्यात मुंबई विभागाच्या आरपीएफ पोलिसांनी 102 पळून आलेल्या मुलांचा शोध घेत त्यांना सुखरुप घरी पाठवले ( Railway Protection Force Repatriated Children Home ) आहे. तसेच, सात प्रवाशांचा जीवही वाचवला ( Railway Protection Force Saved Seven Lifes ) आहे.
102 मुलांची घरवापसी
बाहेर राज्यातील मुलांना मुंबईचे आकर्षण आहे. त्यामुळे अनेक मुले आपले घर सोडून रेल्वेने मुंबईत येतात. याचबरोबर रेल्वे परिसरात हरवलेल्या, रस्त्या चुकलेल्या मुलांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. फेब्रुवारी महिन्यात पळून आलेल्या 102 मुलांची घरवापसी करण्यात आली आहे. ज्यात 66 मुले आणि 36 मुलींसह 102 या मुलांना रेल्वे परिसरातून ताब्यात घेत पुन्हा त्यांच्या राहत्या घरी सोडले आहे. त्याचसोबत मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा जवानांनी 'मिशन जीवन रक्षण'चा एक भाग म्हणून काही वेळा स्वतःचा जीव धोक्यात घालत सात जणांचे प्राण वाचवले आहेत. यापैकी काही जीव वाचवणाऱ्या घटनांचे सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
20 लाख रुपयांच्या वस्तू केल्या परत
रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, आंतरिक हिंसाचार, अंमली पदार्थ जप्त करणे अशा विविध आव्हानांचा सामना करावा लागतो. गेल्या महिन्यात ऑपरेशन अनामत अंतर्गत 20 लाख 3 हजार 872 रुपयांच्या हरवलेल्या वस्तू परत केल्या आहेत. याव्यतिरिक्त आरपीएफ जवानांनी उत्तम नियोजन आणि रणनीती वापरून 8 कोटी 13 हजार 950 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहे.
हेही वाचा - Chitra Wagh On Mahavikas Aghadi : राज्य सरकारला रंगच नाही, ते सरड्यासारखं रंग बदलतात - चित्रा वाघ