मुंबई - नाना पटोले यांनी 4 फेब्रुवारी रोजी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता. नाना पटोले यांची कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज (१२ फेब्रुवारी) त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या नियुक्तीने कॉंग्रेसला राज्यात बळ मिळणार असून पक्षसंघटना मजबूत होईल, असा विश्वास अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
कोण आहे नाना पटोले?
नाना पटोले हे विदर्भातील बहुजन समाजातून पुढे आलेले आक्रमक नेतृत्व आहे. 1999 पासून साकोली मतदारसंघाचे ते सातत्याने प्रतिनिधित्त्व करत आहेत. 2008 साली शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी वाद झाल्याने त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून तिकीट मिळवत ते आमदार झाले. काँग्रेसचा एक बहुजन चेहरा भाजपमध्ये दाखल झाल्याने विदर्भातून याचा अधिक फायदा घेण्याच्या उद्देशाने भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भंडारा-गोंदिया मतदारसंघातून मैदानात उतरवले होते. यावेळी जनतेने पटोलेंना साथ देत लोकसभेत खासदार म्हणून निवडून पाठवले. मात्र, जनतेतून पुढे आलेले हे नेतृत्व भाजप आणि मोदींच्या जनविरोधी धोरणाने अस्वस्त होणार नाही, असे होणे शक्य नव्हते. पंतप्रधान मोदी यांच्या शेतकरीविरोधी भूमिकेमुळे नाराज होऊन पटोलेंनी एक प्रकारे भाजपमध्ये बंडाचा झेंडा उभारला. पंतप्रधान मोदींची धोरणे ही शेतकरी विरोधी आहेत आणि पंतप्रधान पक्षातील खासदारांचेही ऐकून घेत नाहीत, असे म्हणत नाना पटोलेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. एक प्रकारे नाना पटोले हे मोदींशी दोन हात करत भाजपमधील एकाधिकारशाहीला नाकारणारे पहिले नेते ठरले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा काँग्रेसकडून आमदार म्हणून निवडून आले. याच वेळी महाविकास आघाडीचे सरकार आल्याने पटोले यांच्या गळ्यात विधानसभा अध्यक्षपदाची माळ काँग्रेसने घातली.
आक्रमक भूमिकेने नवी छाप पाडण्याचा प्रयत्न
एक वर्षाहून अधिक काळ विधानसभा अध्यक्ष असताना पटोले यांनी आपल्या कार्यकाळात बऱ्याचदा त्यांच्या आक्रमक भूमिकेने मंत्र्यांवर एक नवी छाप पाडण्याचा प्रयत्न केला. तसेच, या पदावर असताना पक्षसंघटनेत अधिक काम करण्यासाठी आपण पूर्णपणे सक्षम असून ती संधी मिळत नसल्याने त्यांनी बऱ्याचदा उघड नाराजी जाहीर केली होती.
का दिला विधानसभाध्यक्ष पदाचा राजीनामा?
काँग्रेसने मुंबई अध्यक्ष पदावरून एकनाथ गायकवाड यांना दूर करून आमदार भाई जगताप यांच्याकडे ही धुरा सोपवली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदाच्या बदलाचे वारे काँग्रेसमध्ये जोरात वाहू लागले. प्रदेशाध्यक्षपदी थोरातच कायम राहतील, कशी काँग्रेसमध्ये चर्चा होती. मात्र, एक व्यक्ती-एक पद या तत्त्वामुळे काँग्रेसने थोरात यांचा राजीनामा घ्यायचे निश्चित केले. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद रिक्त होणार होते. तसेच, गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचे प्रदर्शन बघता काँग्रेसला राज्यात एका सक्षम नेतृत्त्वाची गरज होती. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, अमित देखमुख, पृथ्वीराज चौहान यांच्यासह पटोले यांचेही नाव होते. अखरे नाना पटोलेंच्या नावावर काँग्रेस हायकमांडने शिक्कामोर्तब केल्याने त्यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.