मुंबई - एकनाथ शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यामध्ये हल्ला झाला. शिवसेनेतून बाहेर पडल्यामुळे शिवसैनिकांमध्ये रोष आहे आणि त्यामुळेच हल्ला करण्यात आला असल्याचे एकनाथ शिंदे गटाचे आमदारांकडून आरोप करण्यात येत आहे. मात्र या मुद्द्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आपला अनुभव सांगितला. आपण शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यावेळी शिवसैनिकांचा तिखटपणा आपण चांगलाच अनुभवला असल्याचे भुजबळ म्हणाले. शिवसेना सोडल्यानंतर नागपूरवरून आपण पहिल्यांदाच मुंबई विमानतळावर उतरलो. तेव्हा विमानतळापासून माजलगावमध्ये आपल्या घरापर्यंत रस्त्यावर सगळीकडे काचा पडलेल्या होत्या. अनेक ठिकाणी हल्ला झाल्याची घटना घडली होती. अनेकांची डोकी फुटली होती. त्यामुळे अशा प्रकरणात शिवसेनेचा तिखटपणा आत्ताच नाही पूर्वीपासूनच असल्यासेही छगन भुजबळ ( NCP Leader Chhagan Bhujbal ) म्हणाले आहेत.
'महिना उलटला तरी मंत्रिमंडळ विस्तार नाही' : राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे यांनी आपले सरकार स्थापन केले. मात्र एकनाथ शिंदे यांनी आपले सरकार स्थापन करून एक महिना उलटला असला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलेला नाही. मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही. मंत्रिमंडळ विस्तार होऊन प्रत्येक खात्याला मंत्री असते तर मदतीसाठी शेतकऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना वाट पाहावी लागली नसती, असा खोचक टोला छगन भुजबळ यांनी एकनाथ शिंदे सरकारला लगावला आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तार केला नसला तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सर्व प्रश्न सोडवले तरीही बरे होईल, असा खोचक टोलाही लगावला.
हेही वाचा - Uday Samant : 'सहनशीलतेचा अंत पाहू नका...', उदय सामंतांचा शिवसैनिकांना धमकीवजा इशारा