मुंबई - देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घेण्यासाठी 162 आमदार आम्ही वर्षा बंगल्यावर कधी घेऊन यायचे ते सांगा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपचे वरिष्ठ नेते आशिष शेलार यांना आज दिले आहे.
आज मुंबई काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या 165 आमदारांनी पक्षा आदेशाशी एकनिष्ठ राहण्याची संविधानाला स्मरून शपथ घेतली. त्यात त्यांनी आम्ही एकत्र राहणार असल्याची शपथ घेतल्यानंतर त्यावर शेलार यांनी टीका केली होती. शपथ घेणाऱ्यांमध्ये 142 तरी आमदार होते काय, असा सवाल करत शेलार यांनी या तिन्ही पक्षाच्या आमदारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर नवाब मलिक यांनी एक ट्विट करून आम्ही 162 आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यासाठी कधी घेऊन येऊ असे आव्हान दिले आहे. त्या ट्विटमध्ये मलिक म्हणतात की, भाजपा आमदार आशिष शेलार सांगतायत १६२ संख्याबळ नाही. वर्षावर १६२ जणांना कधी घेऊन यायचं ते सांगा देवेंद्रजीचा राजीनामा घेण्यासाठी.
शेलार यांच्या टीकेला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. आमच्या आमदारांचे संख्याबळ पाहून भाजपचे मनोबल खचले असल्याची टीका सावंत यांनी केली आहे. अंधार्या रात्री मध्ये ज्याप्रकारे निर्णय घेण्यात आला त्याला आता महाराष्ट्रातील जनता ओळखून आहे. त्यामुळे लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या भाजपला आमच्या 162 चा धसका बसला असल्याचेही सावंत म्हणाले.
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या एकूण 162 आमदारांनी आज आम्ही सर्व एक असल्याचे सांगत आज भारतीय संविधानाची शपथ घेतली. यापुढे असेच कायम राहू असा विश्वास व्यक्त केला. यावर भाजपाचे वरिष्ठ नेते अशिष शेलार यांनी यावेळी 142 तरी आमदार होते काय अशी टीका केली होती.