मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या संस्थांवर प्राप्तिकर विभागाने धाडी टाकल्यानंतर राष्ट्रवादीने भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यात नेत्यांना टार्गेट करून त्यांना त्रास देणे व राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, की आधी पश्चिम बंगालमध्ये ईडी आणि एनसीबी या केंद्रीय तपास यंत्रणेला हाताशी धरून त्या राज्यातील नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला. महाराष्ट्रातील नेत्यांना अशाच प्रकारे त्रास दिला जात आहे. राज्य सरकारला केवळ बदनाम करण्यासाठी या तपास यंत्रणेचा उपयोग केंद्र सरकार करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.
हेही वाचा-जशास तसे उत्तरानंतर ब्रिटन वठणीवर! कोव्हिशिल्ड घेतलेल्या भारतीयांना क्वारांटाईनच्या नियमातून सूट
आघाडी सरकार घाबरणार नाही
राज्य सरकारला आणि नेत्यांना बदनाम करण्याचा कट कारस्थान करून महाविकास आघाडी सरकारला घाबरवण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. मात्र केंद्र सरकारच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या या कट-कारस्थानाला महाविकास आघाडी सरकार घाबरणार नाही, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.
हेही वाचा-हा तर अधिकाराचा अतिरेक, आयकर विभागाच्या धाडीवर शरद पवारांची टीका
अकरा तारखेच्या बंदला जनता पाठिंबा देईन
पुढे नवाब मलिक म्हणाले, की केंद्रात असलेले भाजप सरकार हे शेतकरी विरोधी आहे. लखिमपूरमध्ये केंद्रीय राज्य गृहमंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडून मारले. मात्र, केंद्र सरकार या विरोधात कोणतीही कारवाई करत नाही. या घटनेचा निषेध म्हणूनच महाविकास आघाडी सरकारने 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदच्या हाकेला महाराष्ट्रातली जनता पूर्ण पाठिंबा देईल, असा विश्वास नवाब मलिक यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा-प्राप्तिकर विभागाकडून गोरेगावच्या शगुन टॉवरमधील दोन घरांवर छापे; 'हे' आहे अजित पवारांचे कनेक्शन