नवी मुंबई : नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसीमधील एका खाजगी कंपनीला भीषण आग लागली आहे. शॉक सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून सुदैवाने यात कसलिही जीवितहानी झाली नाही.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, ऐरोलीतील रबाळे एमआयडीसीमधील डब्ल्यू ४६, एएसव्ही मल्टी कंपनीला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. यानंतर अग्निशमन दलाच्या ३ एक्स टाईप फायर इंजिन आणि आणीबाणी सेवा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर दीड तासांच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
ग्रीस व ऑइलचे टॅंक असल्याने उडाला आगीचा भडका
संबंधित आग ही शॉक सर्किटमुळे लागली आहे. डब्ल्यू ४६, एएसव्ही मल्टी या कंपन्यामध्ये ग्रीस व ऑईलचे टॅंक असल्याने मोठ्या प्रमाणात आगीचा भडका उडाला. ही आग इतकी भयंकर होती की, आजुबाजुच्या परिसराला धोका निर्माण झाला होता. शेजारी असलेल्या रिलायन्स कंपनीने त्वरीत स्वतः ची यंत्रणा उपलब्ध केली आणि आगीवर पाणी व स्प्रे मारून आग नियंत्रणात आणली.
दीड तास अग्नितांडव
या अग्नितांडवावर नियंत्रण मिळविण्यासाठी सुमारे दीड तासांचा कालावधी लागला. या कंपनीत २० कर्मचारी काम करीत होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी रस्त्याचे काम सुरु असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या आतमध्ये नेण्यासाठी जवानांना त्रासाला सामोरे जावे लागले.