मुंबई - मुंबईला सात तलाव आणि धरणांच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येतो. या धरणांमध्ये गेल्या महिनाभरात समाधानकारक पाऊस पडत नसल्याने पाणीसाठा वाढत नव्हता. मात्र गेल्या काही दिवसात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात समाधानकारक पाऊस होत आहे. यामुळे गेल्या चार दिवसात २ लाख ६८ हजार ९२२ दशलक्ष लिटर म्हणजेच ७० दिवसाचा पाणीसाठा वाढला आहे. धरणांमध्ये सध्या १३८ दिवस म्हणजेच ४ महिने पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सुमारे ९ लाख दशलक्ष लिटर पाण्याची आणखी आवश्यकता आहे. यामुळे मुंबईकरांवर असूनही पाणी कपातीची टांगती तलवार आहे.
७० दिवसांचा पाणीसाठा चार दिवसात वाढला -
मुंबईमध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पावसाळा असतो. दीड कोटी मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात तलावातून दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. जूनच्या सुरूवातीला चार दिवस पाऊस पडल्यावर पावसाने दडी मारली होती. गेल्या आठवड्यात शुक्रवार शनिवारपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. तलावक्षेत्रातही समाधानकारक पाऊस पडत आहे. १७ जुलैला तलावांमध्ये २ लाख ६२ हजार ८१२, १८ जुलैला २ लाख ८७ हजार ८२ दशलक्ष लिटर इतका म्हणजेच १९ टक्के पाणीसाठा होता. गेल्या चार दिवसात सुमारे १७ टक्के पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. या चार दिवसात २ लाख ६८ हजार ९२२ दशलक्ष लिटर म्हणजेच ७० दिवसांचा पाणीसाठा वाढला आहे.
मुंबईला पेयजलासाठी ९ लाख दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता -
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आज सकाळी ५ लाख ३१ हजार ७३४ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा एकूण पाणीसाठ्याच्या ३६.७४ टक्के इतका आहे. हा पाणीसाठा मुंबईकरांना १३८ दिवस म्हणजेच ४ महिने १८ दिवस पुरेल इतका आहे. तलावांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा नोव्हेंबरपर्यंत पुरेल इतकाच आहे. मुंबईकरांना पुढील वर्षाच्या जूनपर्यंत पाणी पूरवठा करता यावा, यासाठी आणखी ९ लाख दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. पावसाचे आणखी दोन महिने बाकी आहेत. या दोन महिन्यात तलाव भरला तरच मुंबईकरांवरील पाणी कपातीचे संकट दूर होणार आहे.
..अन्यथा पाणीकपातीचा निर्णय -
येत्या काही दिवसांत दमदार पाऊस पडला नाही तर मुंबईत पिण्याच्या पाण्याची समस्या कठीण होऊ शकते. पालिका दरवर्षी ३० जुलैपर्यंत पुरेसा पाणीसाठा आणि येत्या काळातील पावसाचा अंदाज घेऊन कपातीचा निर्णय घेते. हवामान विभागाने पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याची वाट पाहू, समाधानकारक पाऊस न आल्यास कपातीचा निर्णय घ्यायचा की आणखी काही दिवस वाट पाहायची याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून देण्यात आली.
धरण, तलावांमधील पाण्याची स्थिती (२१ जुलै २०२१)-
धरण/तलाव | जलसाठा |
मोडक सागर | ८२,८३७ दशलक्ष लिटर |
तानसा | ९६,६८७ दशलक्ष लिटर |
मध्य वैतरणा | ५७,६४३ दशलक्ष लिटर |
भातसा - | २,५८,८२२ दशलक्ष लिटर |
विहार | २७,६९८ दशलक्ष लिटर |
तुळशी | ८,०४६ दशलक्ष लिटर |
एकूण | ५,३१,७३४ दशलक्ष लिटर |
गेल्या तीन वर्षातील पाणीसाठा - (२१ जुलै २०२१) -
वर्ष | जलसाठा |
2021 | ५ लाख ३१ हजार ७३४ |
2020 | ४ लाख ०८ हजार ८८५ |
2019 | ७ लाख ६५ हजार ३२४ |