मुंबई - सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयावर शरद पवार ट्विट करून म्हणाले, 'मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयमार्फत २०१४मध्ये सुरू झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही.' यावर भाजप नेते अतुल भातखळकरांनी पवारांना प्रत्युत्तर देत खोचक टीका केली आहे.
भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले, 'सुशांतसिंहचे प्रकरण नरेंद्र दाभोलकरांसारखे होणार नाही, अशी खोचक टिप्पणी करणाऱ्या शरद पवारांना दाभोलकरांच्या हत्येनंतर 14 महिने राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असल्याचा विसर पडलेला दिसतो. तसेच सुशांतसिंह प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचे काम सरकारने केले आहे, असे सीबीआयचे म्हणणे आहे.' तसेच 'तुमचे सरकार असताना तपास का झाला नाही? पोलिसांनी ज्याप्रमाणे आता कारवाई केली, तशीच त्यावेळीही करण्यात आली होती का? असे सवालही त्यांनी विचारले आहेत.
हेही वाचा - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाची परिणती दाभोलकरांच्या तपासाप्रमाणे होणार नाही, पवारांनी साधला निशाणा
भातखळकर पुढे म्हणाले, 'कवडी मोलाची किंमत नसलेल्या नातवाच ऐकलं असतं, तर खोचक टीका व खोटं बोलण्याची वेळ आली नसती. सीबीआयकडे प्रकरण गेलं आहे. महाराष्ट्र व जनतेला खात्री आहे की आता योग्य तपास होईल.'
हेही वाचा - नरेंद्र दाभोलकर स्मृतीदिन : 'त्यांनी' मारलेली हनुमान उडी म्हणजे...सहकाऱ्यांनी दिला आठवणींना उजाळा