मुंबई - संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत गोरोबा काका, संत जनाबाई यांचा देखावा यंदा प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात दिसणार आहे. ‘महाराष्ट्राच्या संत परंपरे’वर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
असा आहे चित्ररथ -
चित्ररथाच्या प्रारंभी वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची 8 फुटांची आसनस्थ मूर्ती आहे. त्यांच्या मूर्तीसमोर ‘ज्ञानेश्वरी ग्रंथ’ दर्शविण्यात आला आहे. चित्ररथाच्या मध्यभागी ‘भक्ती आणि शक्ती’चा संदेश देणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे कळस असणारे संत तुकाराम महाराज यांची भेट दर्शविणारे प्रत्येकी 8 फूट उंचीचे दोन पुतळे उभारण्यात आले आहेत. या पाठोपाठ राज्यातील संतांचे व कोट्यवधी भक्तांचे दैवत असणाऱ्या पांडुरंगाची कटेवर हात असणारी 8.5 फूट उंचीची लोभस मूर्ती उभारण्यात आली आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात 8 फूट उंचीचा ‘संतवाणी’ हा ग्रंथ उभारण्यात आला आहे व यावर संतांची वचने लिहिण्यात आली आहेत. चित्ररथाच्या दोन्ही बाजूस संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत नामदेव, संत शेख महंमद, संत नरहरी, संत सावता, संत दामाजीपंत, संत गोरोबा, संत एकनाथ, संत सेना, संत चोखामेळा यांच्या प्रतिकृती बनविण्यात आली आहे. या सर्व पुतळ्यांची बांधणी पूर्ण झाली असून त्यावर रंगकाम सुरु आहे.
राज्याच्या चित्ररथ बांधणीचे कार्य नागपूर येथील टीम शुभचे प्रमुख राहुल धनसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. या चित्ररथाचे संकल्पनाचित्र व त्रिमिती प्रतिकृती रोशन गुले आणि तुषार प्रधान या तरूण कलाकारांनी तयार केले आहे. कला दिग्दर्शक नरेश चरडे आणि पंकज इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 30 कलाकार हा आकर्षक चित्ररथ साकारत आहेत.
राजपथावरील महाराष्ट्राच्या चित्ररथांची परंपरा -
प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथांची नेहमीच छाप पडली आहे. सुरुवातीची अनेक वर्षे महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात सहभागी झाला नव्हता. मात्र, नंतर महाराष्ट्राचा संचलनातील सहभाग लक्षणीय ठरला होता. 1980 मध्ये शिवराज्याभिषेक या महाराष्ट्राच्या चित्ररथाने पहिला क्रमांक मिळवला होता. त्यानंतर 1983 मध्ये बैलपोळ्याचा चित्ररथ अव्वल आला होता. 1993, 1994 आणि 1995 अशी सलग 3 वर्षे महाराष्ट्राच्या चित्ररथांनी राजपथावरील संचलनात बाजी मारली होती. त्यानंतर 2015 मध्ये पंढरीची वारी या महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला होता. तर 2018 मध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाने बाजी मारली होती.
2020 मध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला स्थान नाही -
मागील वर्षी राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सामील झाला नव्हता. 2020 च्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनासाठी महाराष्ट्राने पाठवलेला प्रस्ताव नाकारण्यात आला होता. गेल्यावर्षीच्या संचलनासाठी मराठी रंगभूमीचती 175 वर्षे या थीमवर चित्ररथ साकारण्याचा प्रस्ताव केंद्राला दिला होता. पण तो नाकारण्यात आला.