मुंबई - राज्यासह विशेषतः मुंबईत कोरोना बाधितांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत ( Corona in Maharashtra ) आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधाच्या अनुषंगाने आजपासून ( दि. 12 जानेवारी ) विधिमंडळाचे कामकाज दोन सत्रात ( Legislative Work in Two Sessions ) करण्याचा निर्णय विधिमंडळ सचिवालयाने घेतला आहे.
दोन सत्रात कामकाजास आजपासून सुरुवात - राज्यात ज्या पद्धतीने कaरोना रुग्ण संख्येमध्ये वाढ होत आहे. हे लक्षात घेऊन विशेष करुन मुंबईची परिस्थिती पाहता विधिमंडळ सचिवालयाने विधिमंडळाचे कामकाज दोन सत्रामध्ये करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार विधिमंडळातील अधिकारी कर्मचाऱ्यांना दोन सत्रात बोलविण्यात आले आहे. पहिले सत्र सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत तर दुसरे सत्र दुपारी 1 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असणार आहे. यानुसार सर्व विभागातील उपसचिवांना त्यांच्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांचे दोन सत्रात नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे एकावेळी 50 टक्के अधिकारी कर्मचारी उपस्थित राहतील.
मंत्रालयातही दोन सत्रात कामकाज होणार..? - विधिमंडळाला प्रमाणेच मंत्रालयाचे कामकाजही दोन सत्रात करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे दोन सत्रात कामकाज केल्यास गर्दी कमी होईल, अशी मागणीही कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. प्रशासनाच्या स्तरावरही 50 टक्के उपस्थितीत कामकाज करण्याबाबतचा आढावा सुरू आहे. सामान्य प्रशासन विभागाला प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले आहे. अन्य सरकारी कार्यालये आणि मंत्रालयाच्या कामकाजात मोठा फरक आहे. दोन सत्रात काम करण्याबाबत प्रस्ताव आल्यावर निर्णय घेतला जाईल, असे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा - Father arrested for selling baby : बाळाची वडिलांकडून विक्री;11 जणांना केली अटक