मुंबई - कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्र राज्य सज्ज असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. लसीकरण केलेला व्यक्ती ओळखता यावा म्हणून लाभार्थीच्या हाताच्या बोटावर शाई लावली जाणार आहे. तसेच राज्यात पहिल्या टप्प्यातील फ्रंट लाईनच्या कर्मचाऱ्यांना लस देण्यासाठी जवळपास अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल असंही आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.
तीन महिन्यात पहिला टप्पा -
राज्यात आज सर्व जिल्ह्यात लसीकरणाचा ड्राय रन घेण्यात आला. यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे बोलत होते. यावेळी बोलताना राज्यात फ्रंट लाईनचे आठ लाख कर्मचारी आहेत. या आठ लाख कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाईल आणि हा कालावधी पूर्ण करण्यासाठी जवळपास अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल, असे टोपे यांनी सांगितले. लसीकरण हे पूर्णपणे सुरक्षित आहे, असं सांगत तीन महिन्यात लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण होईल. एका राज्यात लसीकरण करण्यासाठी एका लसीलाच मंजुरी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
गरिबांना लस मोफत द्या -
भारत सरकारन दोन लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. मात्र, देशातील परिस्थिती पाहता केंद्र सरकारनं लस आणि लसीकरणाचा खर्च करण्यासाठी खर्च करण्याची मागणी राजेश टोपे यांनी केली. गरिबांना लस देण्यासाठी केंद्रानं खर्च उचलणं गरजेचे आहे. कोरोना लसीचा साठा, लस साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेजचा खर्च आणि लसीकरण करण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचा खर्च केंद्र सरकारनं द्यावा, अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केल्याचं राजेश टोपेंनी सांगितले. केंद्र सरकारकडे कोरोना लसीचा खर्च करण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.
हेही वाचा- चंद्रपुरात शेतकऱ्यानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ताफा अडवला