मुंबई : दसऱ्यासाठी आता अवघे दोन दिवस उरलेले असताना राज्यासहित मुंबईत नवरात्रीची धूम (Navratri Dandia Mumbai) मोठ्या प्रमाणात दिसणार आहे. आज व उद्या रात्री बारापर्यंत सरकारने दांडियाला परवानगी ( two days late night Dandia Mumbai) दिल्याने दांडियाप्रेमी दोन दिवस मुंबईत रात्री उशिरापर्यंत दांडियाची मजा घेताना दिसून येणार आहेत. यातच राजकीय पक्षांचे नेते, फिल्मी कलाकारांसोबत या दांडियाला हजेरी लावणार असल्याने या दांडियात राजकीय रंग सुद्धा दिसून येणार आहेत. (Late Night Dandia Mumbai)
दांडियाच्या आडून प्रचार मोहीम?
मागच्या महिन्यात 26 सप्टेंबर पासून नवरात्रीला सुरुवात झाली आणि बघता-बघता एक आठवड्याचा कालावधी लोटून गेला. आता दसऱ्यासाठी दोनच दिवसांचा अवधी उरला असताना सरकारने या दोन्ही दिवशी दांडियासाठी रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. यामुळे एकीकडे दांडिया प्रेमींमध्ये उत्साह आहे. तर दुसरीकडे या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी राजकीय नेते सुद्धा सज्ज झालेले आहेत. मुंबईत येऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक बघता सर्वच राजकीय पक्षांनी दांडियाच्या आडून प्रचार मोहीम सुरू केली आहे.
फिल्मी कलाकारांसोबत राजकीय नेत्यांची उपस्थिती?
मुंबईत, बोरिवलीत भाजपने गायक फाल्गुनी पाठक, किंजल दवे, पिंकी - प्रीती यांचा दांडिया आयोजित करून दांडिया प्रेमींना आपल्याकडे आकर्षित केले आहे. विशेष म्हणजे पिंकी - प्रीती यांचा दांडिया निशुल्क असल्याकारणाने दररोज हजारोच्या संख्येने दांडिया प्रेमी तिथे दांडियाचा आनंद घेताना दिसून येत आहेत. या दांडियाच्या ठिकाणी भाजप नेते, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष, आशिष शेलार, मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार गोपाळ शेट्टी, भाजप नेते किरीट सोमय्या, नितेश राणे या नेत्यांनी आवर्जून हजेरी लावली असून प्रसिद्ध गायक सोनू निगम यांना सुद्धा आमंत्रित करून लोकांमध्ये एक छाप पाडण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे मुंबईत काळाचौकी येथे भाजपने फक्त ५ दिवसांसाठी मराठी दांडियाचे आयोजन केलं आहे. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते व त्यांची टीम या संपूर्ण दांडियाचे नेतृत्व करत असून फिल्म अभिनेता रणवीर कपूर, सलमान खान अशा दिग्गज अभिनेत्यांनी या ठिकाणी आवर्जून हजेरी लावली असून या दोन दिवसात असंख्य कलाकार इथे उपस्थित राहणार आहेत. परंतु या कलाकारांसोबत भाजपचे नेतेही येथे आवर्जून हजेरी लावून मराठी दांडिया प्रेमींना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करताना दिसून येतील यात काही शंका नाही.
शिवसेनेची टीका?
भाजपने मुंबईमध्ये तब्बल 300 हून अधिक ठिकाणी दांडियाचे आयोजन केल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मराठी माणसांमध्ये फूट पाडण्याचं काम भाजप करत असून त्यामध्ये त्यांना यश येणार नाही असं जरी त्यांनी सांगितलं असलं तरी सध्या मुंबईवर दिसणारा उत्साह बघता भाजपने दांडिया प्रेमींना आपल्याकडे आकर्षित करण्यात तरी यश मिळवलं आहे, यात काही शंका नाही.