मुंबई - राज्यात उष्णतेचा पारा वाढल्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. अतिरिक्त वीज पुरवठा होऊ शकला नाही तर पुढील काळात वीजटंचाईचे संकट अधिक गडद होईल. परिणामी, भारनियमन करावे ( load shedding ) लागेल असा पर्याय ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला. राज्य सरकारने यावर हालचाली सुरू केल्या असून आज (शुक्रवार) मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवली आहे. या बैठकीत टाटाच्या सीजीपीएल ( Coastal Gujarat Power Ltd ) या गुजरातमधील मुंद्रा ( TATA POWER COMPANY ) येथील कंपनीकडून अतिरिक्त ७६० मेगावॅट वीज खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्यात उन्हाचा पारा वाढला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे विजेची मागणी वाढली आहे. २८ हजार मेगावॅट इतकी वीजेची मागणी आहे. वाढत्या तापमानामुळे ती ३२ हजार मेगावॅट पर्यंत जाण्याची शक्यता आहे. राज्यात तूर्तास १५०० मेगावॅट विजेची टंचाई आहे. या पार्श्वभूमीवर भारनियमन करण्याचा इशारा ऊर्जामंत्री नितीन राऊत ( Nitin Raut Minister of Energy ) यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिला. तसेच संकट टाळण्यासाठी वीज खरेदीचा प्रस्ताव ठेवला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी, याबाबत विचारणा केली असता कराराची तयारी पूर्ण झाली नसल्याचे राऊत यांनी सांगितले. तसेच राज्यात भेडसावत असलेल्या वीजनिर्मितीच्या अडचणींचा पाढा वाचला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही गंभीर बाब विचारात घेत, भारनियमन टाळण्यासाठी शुक्रवारी पुन्हा विशेष मंत्रिमंडळ बैठक बोलवली आहे. महाराष्ट्राला कोस्टल गुजरात पावर लिमिटेडच्या ( Coastal Gujarat Power Ltd ) चार हजार मेगावॅट प्रकल्पातून उन्हाळ्यासाठी वीज मिळू शकते. त्यापैकी ७६० मेगावॅट वीज खरेदी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यावर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : ST Workers Strike : न्यायालयाचा आदेश वाचल्याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेणार नाही- गुणरत्न सदावर्ते