मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी राज्यात लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. मात्र असे असताना देखील अनावश्यक कामासाठी अनेक नागरिक बाहेर निघत आहेत. यावर आळा बसावा यासाठी मुंबई पोलिसांनी कलर कोडची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना तीन रंगाचे स्टिकर
मुंबईत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना तीन रंगाचे स्टिकर लावण्यात येत आहेत. मुंबई मधील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी आणि विनाकारण बाहेर फिरणाऱ्यावर आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. यासाठी आता मुंबईतील पोलीस आयुक्त अगदी तातडीने या कामाला लागलेले दिसत आहेत. परिमंडळ सात चे उपायुक्त प्रशांत कदम यांनी स्वतः मुंबई चे प्रवेशद्वार असलेल्या आनंद नगर टोल नाक्यावर या मोहिमेला सुरुवात केली आहे. प्रत्येक वाहन तपासून त्यांना हे स्टिकर लावले जात आहेत.
ट्रॅफिक कोंडीतून सुटकेसाठी कलर कोड सिस्टीम लागू -
मुंबईमध्ये अनावश्यक कारणासाठी बाहेर पडणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आज रात्री आठ वाजल्यापासून प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी करून अशा वाहनांवर कारवाई करणार आहेत. मात्र ह्या नाकाबंदीमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी देखील अडकण्याची शक्यता दाट शक्यता आहे. त्यामुळे ट्रॅफिक कोंडी पासून त्यांची सुटका व्हावी यासाठी मुंबई पोलिसांनी कलर कोड सिस्टीम लागू केली आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील वाहने, खाद्यपदार्थांची वाहतुक करणारी वाहने आणि आरोग्य सेवेतील वाहने यांच्यावर वेगवेगळ्या रंगाचे स्टिकर लावण्यात येणार आहेत. त्यामुळे पोलिसांना अशी वाहने पटकन नजरेस पडतील आणि त्यांना नाकाबंदीतून ताबडतोब सोडता येईल. आज मुलूंड टोल नाका येथे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय दराडे यांनी या कामाची पाहणी केली.
हेही वाचा - दिलासादायक! औरंगाबादच्या चार रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्रकल्प सुरू