मुंबई - मुंबई महानगरपालिकेत उंदीर मारण्याच्या कामात ( BMC RAT Killing Scam ) भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाने स्थायी समितीमध्ये केला होता. १ कोटी रुपये खर्च करताना किती उंदीर मारले याची आकडेवारी पालिकेने दिलेली नाही. त्यामुळे उंदिर मारण्याच्या कामात १ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला होता. त्यावर मार्च २०२० ते जानेवारी २०२२ या कालावधीत पालिकेच्या १२ विभागात ४ लाख १३ हजार ४९२ उंदीर मारल्याचा दावा पालिका ( BMC Statement On RAT Killing ) प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
किती उंदीर मारले, भाजपचा प्रश्न -
मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये उंदिर मारण्याबाबतचा प्रस्ताव आला होता. त्यात ए ते टी विभागात म्हणजेच मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात १ कोटी रुपये खर्च करून उंदिर मारण्यात आल्याचे म्हटले आहे. एक उंदिर मारण्यासाठी २० रुपये तर ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा अधिक उंदिर मारल्यास प्रत्येक उंदिर मारण्यास २२ रुपये या दराने उंदिर मारण्यात आल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. या प्रस्तावर बोलताना पालिकेने केवळ ५ वॉर्डमध्ये १ कोटी रुपये खर्च करून उंदीर मारले आहेत. मात्र किती उंदिर मारले याचा आकडा पालिकेने दिलेला नाही. उंदरांच्या उत्पतीची कारणे कोणती ती सुद्धा प्रस्तावात दिलेली नाहीत. यामुळे नक्कीच उंदिर मारले गेले का यावर भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. यामुळे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा प्रस्ताव राखून ठेवला होता.
४ लाख उंदीर मारले -
प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर पालिका प्रशासनाने उत्तर दिले आहे. त्यात पालिकेने या १२ प्रभागात मार्च २०२० ते जानेवारी २०२२ या कालवधीत ४ लाख १३ हजार ४९२ उंदीर मारण्यात आले. जानेवारी २०२० मध्ये २५ हजार १८ उंदरांचा नाश करण्यासाठी ४ लाख ९८ हजार ४३८ रुपयांचा खर्च केला आहे. फेब्रुवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ या काळात २ लाख ३२ हजार ९०४ उंदीर मारण्यात आले. त्यासाठी पालिकेने ४६ लाख ८२ हजार २४ रुपये खर्च करण्यात आले आहेत. मार्च २०२० ते जानेवारी २०२१ या काळात १ लाख ५५ हजार ५७० उंदीर मारण्यात आले आहेत. त्यासाठी पालिकेने २७ लाख ६९ हजार रुपये खर्च केल्याचे म्हटले आहे. पालिकेने मार्च २०२० मध्ये मुंबईतील २२ प्रभागांसाठी मुषक नाशक म्हणून खासगी संस्थाची नियुक्ती केली होती. मात्र, कोविडमुळे त्यातील १२ प्रभागात उंदीर मारण्याचे काम झाले. मार्च २०२० ते जानेवारी २०२१ या ११ महिन्यानंतर पुन्हा याच प्रभगातील संस्थांना मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ डिसेंबर २०२१ पर्यंत होती, अशी माहिती महानगरपालिकेने स्थायी समितीच्या पटलावर मांडली आहे.
फक्त याच प्रभागात झाले काम -
मुंबई महानगरपालिकेचे २४ विभाग कार्यालय आहेत. त्यापैकी डी, एफ दक्षिण, एफ उत्तर, जी दक्षिण, जी उत्तर, एच पुर्व, एच पश्चिम, आर दक्षिण, एल, एम पूर्व, एम पश्चिम, एन या विभागात उंदीर मारण्यात आले आहेत.
हेही वाचा - Tragic accident in Kota : चंबळ नदीत कार कोसळली, वरासह 9 जणांचा मृत्यू, सीएम गेहलोत यांनी व्यक्त केला शोक