मुंबई - जागतिक दर्जाचे शहर असलेल्या मुंबईत रोज हजारो मॅट्रिक टन कचरा निर्माण होतो. या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा मोठा प्रश्न असतो. मात्र महापालिकेने आता उच्च न्यायालयाच्या आदेशाने कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. देवनार डम्पिंग ग्राऊंडवर ६०० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून विजनिर्मिती केली जाणार आहे. या निर्णयामुळे देवनार डंपिंगवरील कचऱ्याचे प्रमाण व दुर्गंधीचे प्रमाण कायम स्वरूपी संपुष्टात येणार आहे.
कचरा विल्हेवाटीचा प्रश्न सुटणार कचरा कमी करण्यासाठीच्या उपाययोजना -
मुंबईत रोज नऊ हजार मॅट्रिक टन कचरा निर्माण होत होता. पालिकेने गेल्या काही वर्षांत पुनर्विकास होणाऱ्या इमारती आणि संकुलांना परिसरातच कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे प्रकल्प सुरू करण्याची सक्ती केली आहे. यामुळे नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतींच्या संकुलात गांडूळ खत, कचऱ्याचे वर्गीकरण, ओल्या कचऱ्याची विल्हेवाट असे प्रकल्प राबवण्यात आले. या प्रकल्पामुळे मुंबईतील कचऱ्याचे प्रमाण कमी होऊन सात ते साडेसात मॅटिक टनवर आले आहे. मुंबईमधील कचऱ्याचे प्रमाण कमी झाले असले तरी कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही.
मुंबईतील कचरा विल्हेवाटीचा प्रश्न सुटणार कचरा प्रश्न सुटणार -मुंबईतील कचरा कमी करता यावा, मुंबईमधील डम्पिंग ग्राउंड मुंबईबाहेर न्यावीत म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने डम्पिंग ग्राऊंड शहराबाहेर नेण्याचा आणि कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार मुंबई महापालिकेने पालिकेने देवनार येथे ६०० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रकीया करून विजनिर्मिती करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे देवनार डंपिंगवरील कचऱ्याचे प्रमाण व दुर्गंधीचे प्रमाण कायम स्वरूपी संपुष्टात येणार आहे. तसेच, पालिकेला कचऱ्यापासून निर्माण करण्यात येणाऱ्या विजेचा वापर करता येणार आहे.
निर्णय योग्य, बेस्टला वीज द्यावी - देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्यापासून वीज निर्मिती केली जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील कचरा आणि त्याची दुर्गंधी कमी करण्यासाठी हा निर्णय योग्य आहे. कचऱ्यापासून वीज निर्मिती झाल्यास पालिका ही वीज कंपन्यांना विकू शकते. पालिकेच्या अखत्यारीत येणारा बेस्ट उपक्रम तोट्यात आहे. या उपक्रमाच्या वीज विभागाला ही वीज दिल्यास बेस्टला त्याचा फायदा होऊ शकतो असे विरोधी पक्ष नेते व बेस्ट समिती सदस्य रवी राजा यांनी म्हटले आहे.