मुंबई - भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सचिन सावंत यांच्या पत्रकार परिषदेवर टीका केली आहे. सचिन सावंत यांची पत्रकार परिषद हास्यास्पद आहे. काँग्रेसने परमबीर सिंग आणि सचिन वाझे प्रकरणांमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. कारण कालपर्यंत हेच लोक पोलिसांचं समर्थन करत होते, असं उपाध्ये यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.
'गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा'
परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी त्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र देखील पाठवले आहे. त्यांच्या पत्राला चोवीस तास उलटून गेले तरी मुख्यमंत्र्यांकडून कोणतीही प्रेस नोट काढण्यात आली नाही. मुख्यमंत्री या प्रकरणावर बोलण्याचे टाळत आहेत. दुसरीकडे गृहमंत्र्यांवर शरद पवार नाराज आहेत अशा बातम्या येत आहेत. मात्र पवार देखील या विषयावर बोलायला तयार नाहीत. त्यामुळे राज्यात खंडणीखोर लोक सरकार चालवत असल्याचा समज जनतेमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.
पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणाले सावंत?
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, परमबीर सिंग यांची भूमिका चुकीची असल्याचे म्हटले आहे. त्यांच्यावर केंद्र सरकारचा दबाव असल्याचा आरोप देखील सावंत यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. त्यामुळेच परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर आरोप करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिल्याचे ते म्हणाले. दरम्यान यावर टीका करताना केशन उपाध्ये यांनी कॉंग्रेसचे हे आरोप हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे.