मुंबई - माध्यमिक शाळा संहितेनुसार सुट्टी देण्याचे अधिकार शाळांना असतांना व त्यानुसार परवा सुट्टी जाहीर झाली असतांना दिवाळी सुट्टी २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर असा बदल केला. शिक्षण सहसचिवांनी काढलेले शासन परिपत्रक व शिक्षणमंत्र्यांनी केलेले ट्विट नियमबाह्य असल्याची टीका भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केली आहे. तसेच मुंबईत परवा शिक्षण निरीक्षकांनी काढलेले पत्र ग्राह्य धरावे, अशी मागणी अनिल बोरनारे यांनी केली आहे. आज काढलेल्या परिपत्रकामुळे शाळांमध्ये पुन्हा गोंधळ निर्माण झाला आहे.
शिक्षण निरीक्षकांनी काढलेल्या आदेशानुसार मुंबईतील शाळांना १ ते २० नोव्हेंबर अशी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार अनेक शाळांनी ३० ऑक्टोबरपर्यंत प्रथम सत्र परीक्षेचे आयोजन केले आहे. त्या परीक्षांचे नियोजन कोलमडून पडणार आहे. अनेक पालकांनी व शिक्षकांनी गावी जाण्याचे नियोजन केले असून रेल्वे व बसचे आरक्षण केले आहे. परवा याबाबत मुंबईतील शिक्षण निरीक्षकांनी सुट्टीबाबत आदेश काढले, तसे शाळांनी नियोजन करून परीक्षांचे आयोजन व सुट्टीबाबत पालकांना कल्पना दिली. मग आज पुन्हा यामध्ये बदल करून गोंधळाची परिस्थिती का निर्माण केली ? असा सवालही अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्र्यांना विचारला असून आधीच घोषित करण्यात आल्याप्रमाणे १ ते २० नोव्हेंबर अशी सुट्टी देण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा - नवाब मलिक एकप्रकारे समीर वानखेडेंना धमकावत आहेत, मंगलप्रभात लोढा यांची राज्यपालांकडे तक्रार