कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज कोल्हापुरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा ( Swabhimani Shetkari Sanghatana march kolhapur Collector Office ) काढला. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी आपल्या पाच मागण्या सरकारकडे केल्या आहेत. जर या मागण्या मान्य नाही झाल्या तर, हे आंदोलन अजून तीव्र करू, असा इशारा राजू शेट्टी ( Raju Shetti ) यांनी दिला. दरम्यान, या आंदोलनाचे पुढील टप्पे देखील त्यांनी जाहीर केले आहेत.
हेही वाचा - Mumbai Corona Update : मुंबईत मंगळवारी २३५ नव्या रुग्णांची नोंद, शून्य मृत्यूची नोंद
चालू गळीत हंगामातील एफआरपी अधिक दोनशे रुपये द्या, वीजबिलांतील त्रुटी दूर करा, नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान द्या, या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांसह आज, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाच्या माध्यमातून येऊन धडकली. यानंतर मोर्चाचे सभेमध्ये रुपांतर झाले.
महावितरण कार्यालयावर स्वाभिमानीचे धरणे आंदोलन
कोल्हापुरातील दसरा चौकातून छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून निघालेल्या या भव्य मोर्चामध्ये असंख्य शेतकरी सहभागी झाले होते. नियोजित वेळेच्या तब्बल 2 तास उशिरा हा मोर्चा सुरू झाला. मोर्चा दसरा चौक मार्गे, व्हीनस कॉर्नर मार्गे येत जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. दरम्यान हा मोर्चा सभेत रुपांतर झाला आणि स्वाभिमानीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीसह केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली.
साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना देण्यात येणारे एफआरपी, रासायनिक खते, कृषी अवजार, पशुखाद्याचे झालेली दरवाढ, भूमि अधिग्रहण कायदा, वीजबिलाचा प्रश्न आणि राज्य सरकारने जाहीर केलेले 50 हजार रुपयांचे अनुदान यातील एकही प्रश्न या दोन्ही सरकारांना सोडवता आले नाही, असे म्हणत राजू शेट्टी यांनी दोन्ही सरकारला अल्टिमेटम दिले आहे. जर त्यांच्या या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या नाही तर, टप्प्याटप्प्याने हे आंदोलन पुढे नेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. दरम्यान पहिला टप्पा म्हणून वीज बिलांसाठी केवळ 10 हजार कोटी लागणार आहेत. त्याची तरतूद करावी. दिवसा दहा तास वीज द्या. हा निर्णय आठ दिवसांत नाही केला तर, 22 तारखेपासून कोल्हापूर महावितरण कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा राजू शेट्टी यांनी इशार दिला.
अन्यथा केंद्रीय मंत्र्यांना..
रासायनिक खताचे दर बेसुमार वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचे प्रयोग केले आहेत. मात्र, ही शेती फायद्याची नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याला परवडेल अशा दरात रासायनिक खते देणे गरजेचे आहे. त्यामुळे, पशुखाद्याच्या किमती नियंत्रित करा. जर उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर, रासायनिक खताच्या किमती कमी कराव्याच लागतील. तसेच, २०१३ ला यूपीए सरकारने केलेल्या जमीन अधिग्रहित कायद्याप्रमाणे बाजारभावाच्या चौपट रक्कम देण्यात यावी. तरच, शेतकऱ्याला परवडेल. राज्य सरकारने केलेला नवीन कायदा म्हणजेच रेडीरेकनरच्या केवळ दुप्पट रक्कम देण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांना मान्य नाही. हा निर्णय शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा आहे. यामुळे या पुढे रस्त्यासाठी शेतकरी जमीन देणार नसल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. तसेच, जर खतांचे दर कमी झाले नाहीत तर, केंद्रीय मंत्र्यांना महाराष्ट्रात येणे अवघड करून टाकू, असा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिला.
एक कणही साखर गोडाऊनच्या बाहेर पडू देणार नाही
साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाचा दुसरा हप्ता 200 रुपये द्यावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. तसेच, साखर कारखान्यांना अल्टिमेटम देखील दिला आहे. येत्या 15 मार्च पर्यंत जर दुसरा हप्ता दोनशे रुपये दिला नाही तर, साखर कारखान्यातील गोडाऊनमधून साखरेचा एक कण देखील बाहेर पडू देणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला.
अजित पवारांच्या कार्यालयावर काढणार मोर्चा
महा विकास आघाडी सरकारची स्थापना झाल्यानंतर उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्याप देखील शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले नसल्याचे राजू शेट्टी यांनी आरोप केले आहेत. तसेच, येत्या अधिवेशनात नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचे तरतूद करून मंजूर करावे. अन्यथा अजित पवारांच्या बारामतीतील कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे मोर्चा नेण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.
हेही वाचा - Pravin Darekar on Sanjay Raut : संजय राऊत यांची पत्रकार परिषद म्हणजे फुसका बार - दरेकर